जलसंवर्धनासाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा : प्रा. सुरेश बिराजदार
मुरुम (एल.पी.उगीले)
वाढते कॉंक्रिटीकरण आणि जलसंवर्धनाच्या अभावामुळे सध्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्वत्र जाणवतो आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर जल संवर्धनाबरोबर पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे, आणि हे काम ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाशिवाय शक्य होणार नाही. असे मत सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केले. ते श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सरपंच पाणी परिषद आणि कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते.
येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय जल दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या आयक्यूएसी जलसाक्षरता विभाग, रोटरी क्लब उमरगा, रोटरी क्लब किल्लारी, भूजल सर्वेक्षण विभाग छत्रपती शिवाजी बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उमरगा, लोहारा तालुका सरपंच पाणी परिषद आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत छत्तीस गावातील सरपंचांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सहभाग घेतला. यावेळी बोलताना सुरेश बिराजदार यांनी जिल्ह्यातील जल संवर्धनाच्या कामाबद्दल माहिती दिली.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात धाराशिव येथील डॉ. नितीन पाटील यांनी पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत, पाण्याचे योग्य नियोजन,शेतीसाठी आणि पिण्यासाठी दिवसाकाठी लागणारे पाणी, याची शास्त्रीय मांडणी करून जल संवर्धन कसे करावे? यांनी सविस्तर माहिती उपस्थित सरपंचांना दिली.
दुसऱ्या सत्रात शहरातील प्रसिद्ध डॉ. दीपक पोफळे यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून राज्यभरात जलसंवर्धना साठी केलेल्या कार्याची माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे दिली. 2012 ते 2016 या दरम्यान दुष्काळी परिस्थितीत ही जलसंवर्धनची कामे फायदेशीर ठरल्याचे प्रतिपादन केले.
तिसऱ्या सत्रात उपस्थित सरपंचांनी आपल्या गावात जलसंवर्धनच्या केलेल्या कार्याची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. यावेळी जकेकुर वाडीचे सरपंच अमर सूर्यवंशी, व्हताळचे सरपंच माधव जाधव कडादोराचे सरपंच यांनी आपले विचार मांडले.
यावेळी विभागीय स्पर्धेत पारितोषिक प्राप्त जकेकुरवाडीचे सरपंच अमर सूर्यवंशी आणि ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला.माती परीक्षण चे सादरीकरण डॉ डी एस इटले आणि पाणी परीक्षणाचे सादरीकरण भूजल सर्वे विभागाचे सुरेश राठोड यांनी केले. तसेच जल प्रशिक्षक सचिन सूर्यवंशी यांनी जलसंवर्धनाचे महत्व स्पष्ट केले.
समारोपाच्या सत्रात विस्तार अधिकारी निवास पाटील किशोर औरादे आणि कृषी अधिकारी सुप्रिया रामशेठवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केला. यावेळी नायब तहसीलदार सचिन बिराजदार, रोटरी क्लबचे सचिव जुगल किशोर खंडेलवाल, श्री जोशी, उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ. पी ए पीटले, उपप्राचार्य प्रा. जी एस मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी, समितीचे प्रमुख डॉ. एस एम सुरवसे आदींची उपस्थिती होती. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. विनोद देवरकर, प्रास्ताविक डॉ. अस्वले यांनी केले तर आभार डॉ. एस. एम. सुरवसे यांनी मानले.
