बाबासाहेब आंबेडकरांची त्रिसूत्री भारताला महासत्ता बनवेल– प्रा. खंदारे
उदगीर (एल.पी.उगीले)
बाबासाहेब आंबेडकरांची त्रिसूत्रीच भारत महासत्ता बनण्याची गुरुकिल्ली आहे. असे प्रतिपादन श्यामलाल कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एम. खंदारे यांनी केले. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताहानिमित्त ‘म. फुले, राजर्षी शाहू आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि आजचे वास्तव’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य प्रा. मनोहर पटवारी होते. मंचावर प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, सामाजिक कार्यकर्ते रंगा राचुरे, समिती प्रमुख प्रा. डॉ. बी. एस. भूक्तरे, पर्यवेक्षक प्रा. टी. एन. सगर यांची उपस्थिती होती. खंदारे पुढे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली त्रिसूत्री म्हणजे शिक्षण, समता आणि न्याय हे तत्व, महासत्ता होण्यासाठी शेतकऱ्यांना विकसित करावे लागेल, आंबेडकरांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी मांडलेले समान न्यायाच्या तत्वाचे पालन केल्यास तोच त्यांचा विचाराचा जागर होईल. महापुरुषांचे उच्च आणि श्रेष्ठ विचार आचरणीय झाल्यास त्यांना खरे वंदन होईल. अध्यक्षीय भाषणात प्रा. पटवारी यांनी सामाजिक परिस्थिती सुधारणा करण्यासाठीची जवाबदारी उच्चशिक्षित लोक आणि संस्थांनी घेतल्यास देशाची प्रगती होईल, असे सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मस्के यांनी तर सूत्रसंचालन प्रा. प्रवीण जाहुरे यांनी केले, आभार प्रा. प्रवीण आंबेसंगे यांनी मानले.
