महात्मा बसवेश्वरांचे समतेचे विचार आजही प्रासंगिक – किरण कोरे

उदगीर (एल पी उगिले) – बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समतेच्या तत्वावर आधारित समाजाची उभारणी करून एक महत्त्वपूर्ण कार्य केले, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. किरण कोरे यांनी केले. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित “महात्मा बसवेश्वर यांचा विचार आणि त्यांची प्रासंगिकता” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य प्रा. मनोहर पटवारी होते. यावेळी बसवराज पाटील मलकापूरकर, प्रशांत पेन्सलवार, शिवराज वल्लापुरे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, पर्यवेक्षक प्रा. एस. व्ही. मुडपे, प्रमोद शेटकर, रवींद्र हसरगुंडे, बाबुराव माशाळकर, बाबुराव पांढरे आणि प्राचार्य विजयकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात प्रा. किरण कोरे म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली, स्त्रियांना समान हक्क बहाल केले, आणि दासोहाच्या माध्यमातून दानाची नवी संकल्पना मांडली. जातीव्यवस्थेविरोधात त्यांनी सिद्धांतिक बंड करून ‘देह हेच देवालय’ ही धारणा पुढे आणली. त्यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहेत. अध्यक्षीय समारोपात प्रा. मनोहर पटवारी यांनी महात्मा बसवेश्वरांनी समतेवर आधारित लोकशाही समाजाची पायाभरणी केली असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. सुनंदा भद्रशेट्टे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. बी. एस. भुकतरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. एम. डी. समगर यांनी मानले.