जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न

लातूर (एल पी उगिले)
जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती तसेच पाणीटंचाई आढावा बैठक पार पडली. तत्पुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने सुरु करण्यात आलेल्या अभ्यागत कक्ष मदत व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीला पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
लोकप्रतिनिधींनी विकासाविषयी सादर केलेल्या विकास प्रस्तावनांची त्यांच्या कडून खातरजमा करून त्यांना प्राधान्याने मंजुरी द्यावी, अशी सूचना यावेळी केली. तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पांची तत्काळ दुरुस्ती आवश्यक आहे. त्यासंबंधीची प्रक्रिया लवकर पार पाडवी. जेणे करून सिंचन क्षेत्रात वाढ होईल. पाणीटंचाईच्या काळात अधीग्रहण केलेल्या विहिरींच्या देय रक्कमा प्रलंबित असून ती रक्कम तत्काळ देण्यात यावी. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन मागणी केल्यानंतर ठराविक कालावधीतच टँकर उपलब्ध व्हावेत, यासाठी जलदगतीने कार्यवाही करण्यात यावी, असे सांगितले.
जलजीवन मिशन अंतर्गतची सुरु असलेल्या कामांची पूर्तता लवकरात लवकर करावीत. याचबरोबर या मिशन अंतर्गत अनेक कामे पूर्ण झाली आहेत. परंतु महावितरणची विद्युत जोडणी न झाल्यामुळे यातून अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. अशा प्रकल्पांना महावितरणने लवकरात लवकर विद्युत जोडणी द्यावी, अशी सूचना देखील केली.
याप्रसंगी खा. डॉ. शिवाजीरावजी काळगे, आ. रमेशप्पाजी कराड, आ. अभिमन्यूजी पवार, आ. संजयजी बनसोडे, आ. विक्रमजी काळे, जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक सोमय्याजी मुंडे, मुख्य कार्य अधिकारी राहुलकुमारजी मीना, मनपा आयुक्त देविदासजी जाधव आदींसह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.