सवयीचा संग्रह असलेला माणूस सवयीमुळेच घडतो आणि बिघडतो ही – साईविश्व बिरादार

उदगीर (प्रतिनिधी)
कुठल्याही कृतीतली सहजता म्हणजे सवय. कामाचं स्वरूप आणि कृती यावरून सवयी लागतात. सवयी ह्या पुनरावृत्तीतून निर्माण होतात. आजची सवय म्हणजे भूतकाळातले निर्णय असू शकतात. सवयीमुळे भविष्य घडते. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी सवयी महत्त्वाच्या ठरतात. कारण सवय शरीराची असते, पण त्रास मात्र मनाला होतो. काही सवयींना आपण घडवतो नंतर त्याच सवयी आपल्याला घडवतात. सवयी या दिनचर्येचा महत्त्वपूर्ण भाग असतात. काही सवयी चांगल्या तर काही वाईट असतात. म्हणून सवयींचा संग्रह असलेला माणूस सवयीमुळेच घडतो आणि बिघडतोही, असे मत साईविश्व अनुजा दिनकर बिरादार यांनी व्यक्त केले.
माजी गटशिक्षणाधिकारी बालाजी बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या व चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गतच्या 337 व्या विशेष बाल वाचक संवादमध्ये साईविश्व अनुजा दिनकर बिरादार या विद्यार्थ्याने प्रसाद ढापरे लिखित ,”सवयी घडवतात, बिघडवतात” या साहित्यकृतीवर बोलताना पुढे म्हणाला की, सवयी आपल्याबरोबर 24 तास असतात, म्हणून त्या चांगल्याच असाव्यात. वाईट सवयी ह्या क्षणिक आनंददायी असतात. या पुस्तकात लेखकाने सवयी लागण्या मागची कारणे आणि त्या बदलण्याचे उपाय सुचवतानाच सवयींचे प्रकार, सवयींची सुरुवात सांगत सवयी न बदलण्या मागची कारणे, सवयी विकसित करण्याच्या पद्धती सांगितलेल्या असून सवयी चांगल्या की वाईट? ते कसे ओळखावे, हेही सांगितलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने वाचावेच असेही आवर्जून त्यांनी सांगितले.
यानंतर झालेल्या चर्चेत अनेकांनी सहभाग नोंदवला. या सर्वांच्या प्रश्नाला अत्यंत समर्पक अशी उत्तरे देऊन सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न संवादक साईविश्व बिरादार यांनी केला. अध्यक्षीय समारोप करताना माजी गटशिक्षणाधिकारी बालाजी बिरादार म्हणाले की, जगण्याच्या प्रवासामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या सवयीमुळेच घडत किंवा बिघडत असतो. प्रत्येक चांगले-वाईट घडण्याला कारण माणसाची सवयच असते. त्यामुळे सवयी लावून घेत असताना योग्य विचार करणे गरजेचे असते. साईविश्वने या ठिकाणी सुंदर असे विवेचन करून सवयीच्या संदर्भात आपल्याला जागे केलेले आहे. असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत मेत्रे यांनी केले तर संवादाकाचा परिचय अभिषेक बिरादार यांनी करून दिला आभार प्रदर्शन कुमारी दिपाली मेत्रे हीने मानले.