राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा

उदगीर (एल पी उगिले) तालुक्यातील मौजे सोमनाथपूर येथे राज्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय डेंग्यू साजरा केला जातो. त्यानिमित्त डेंग्यूविषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांना सक्रियपणे सहभागी करून घेण्यात येते. विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यत माहिती पोहचवणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळ सुदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त परिस्थतीमुळे पाण्याचा तुटवडा असल्याने लोकांची पाणी साठवण्याची वृत्ती आढळून येते. त्या अनुषंगाने अशा साठवलेल्या पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डासोत्पती होते. या डासाची उत्पती कमी करणे, नियंत्रणात ठेवणे यासाठी जनतेस आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. आजाराचे नियंत्रण करण्यासाठी या मोहिमेमध्ये जनतेचा सहभाग आवश्यक आहे.
लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन यशस्वी होण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमीक आरोग्य केंद्र गुडसूर, उपकेंद्र
डोंगर शेळकी अंतर्गत सोमनाथपूर गावात राष्ट्रीय डेंग्यू दिना निमित्ताने “प्रतीज्ञा…..डास निर्मुलन” घेवून डॉ. कुरेशी एस. एन.यांनी नागरीकांना स्वच्छतेचे आणि डास निर्मूलनाचे आवाहन आवाहन केले आहे.
यावेळी डॉ.कुरेशी एस.एन., राठोड एस, वाया, वजिरे एम.एन., गावच्या सरपंच अंबिका पवार, सदस्या शिवकर्णा अंधारे, वंदना केंद्रे, अंगणवाडी मदतनीस क्रांती कांबळे, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
याप्रसंगी उपस्थित त्यांनी जनतेला मार्गदर्शन करताना डेंग्यू,चिकुनगुनिया बाबतची लक्षणे सांगितली. यामध्ये प्रामुख्याने एडीस एजिप्टाय डासाच्या संक्रमणात्मक चाव्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर डेग्यूंची लागण होते. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक हा ताप अधिक तीव्र स्वरुपाचा असून त्यामुळे मृत्यू ओढावू शकतो. लहान मुलांमध्ये शक्यतो सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठ्या माणसामध्ये अधिक तीव्रपणे तापासोबत डोके दुखणे, डोळे दुखणे, अंगदुखी, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अशी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावा. शासकीय रुग्णालयामध्ये मोफत उपचार होतो.
अशा स्वरूपाचे रोग होऊ नये त्यासाठी उपाय योजना म्हणून डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडीस एजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी 8 दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालून अंड्याचे रुपांतर डासात होते. त्यानुषंगाने कोणतेही साठवलेले पाणी 8 दिवसापेक्षा जास्त ठेवू नये, ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
डासोत्पती नियंत्रणासाठी गप्पी माशांची उपयुक्तता, परिसर स्वच्छता, व्यक्तीगत सुरक्षेअंतर्गत मच्छरदाण्यांचा वापर, डासांच्या चाव्यापासून रक्षणासाठी विविध उपाय करण्यासाठी कोरडा दिवस पाळून किटकजन्य आजार डेंग्यू, चिकुनगुनिया आजारावर नियंत्रण ठेवण्यास जनतेने सहकार्य करावे असे आवाहन डॉ. कुरेशी एस. एन. यांनी केले आहे.