ॲड. ब्रह्माजी केंद्रे यांची शिवसेना पक्षाच्या प्रभारी जिल्हाप्रमुख पदी

उदगीर (एल पी उगिले) येथील निष्ठावंत शिवसैनिक तथा संघटन कुशल नेतृत्व ॲड. ब्रह्माजी केंद्रे यांच्या धडाडीच्या कार्याची दखल घेऊन शिवसेनेची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. शिवसेना मुख्यनेते ना. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना सचीव संजय मोरे यांच्या हस्ते ॲड. ब्रम्हाजी केंद्रे यांची शिवसेना पक्षाच्या प्रभारी जिल्हाप्रमुख पदी (उदगीर व अहमदपूर विधानसभा कार्यक्षेत्र) नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी माजी तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, मुक्तेश्वर पाटील, अनिल पंचाक्षरी, संजय देशमुख नगरसेवक जळकोट हे उपस्थित होते.
उदगीर तालुक्याला आतापर्यंतच्या शिवसेनेच्या इतिहासा मध्ये ”जिल्हाप्रमुख” पदाचा बहुमान पहिल्यांदाच मिळल्यामुळे, कार्यक्षेत्रात सर्वत्र उत्साहचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हाप्रमुख पदी निवड केल्याबद्दल ना. एकनाथभाई शिंदे, खा.डॉ. श्रीकांत शिंदे,शिवसेना मुख्य सचिव संजय मोरे, संपर्कप्रमुख ऍड. श्रीनिवास क्षीरसागर आणि लातूर जिल्ह्यातील सर्व आजी, माजी पदाधिकारी व शिवसैनिकांचे जाहीर आभार मानले आहे.
ॲड. ब्रह्माज केंद्रे यांनी अत्यंत कुशल पद्धतीने आजपर्यंत राजकारण करून आपल्या कार्यपद्धतीचा ठसा उदगीर तालुक्यावर उमटवला आहे. उदगीर पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजलेली आहे. गावच्या सरपंचापासून ते तालुक्याच्या मुख्य स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या पदावर कार्य केले आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ते काम करतात. शिवसेना संघटना बांधणीसाठी अशाच कुशल नेतृत्वाची गरज लातूर जिल्ह्याला होती, ती गरज आता पूर्ण झाली आहे. असे विचार या निवडी प्रसंगी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगे टोल यांनी व्यक्त केले.
निवडीचे पत्र देऊन सत्कार केल्यानंतर सत्कारला उत्तर देताना ॲड. ब्रह्माजी केंद्रे म्णाले की , पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर फार मोठा विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाला पात्र राहून संघटनेचे काम वाढवणे आणि शिवसेनेमध्ये कसलेही मतभेद नाहीत हे जनतेला ठासून सांगण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जाईल. शिवसेना ही महायुतीचा घटक पक्ष असल्याने महायुतीच्या कामामधून सर्वसामान्य माणसांची कामे गतीने कशी होतील या दृष्टीने जिल्हाभर काम केली जातील असे आश्वासन दिले. आपण संघटन वाढीसाठी साम-दाम-दंड-भेद या सर्व नीतींचा वापर करून तन मन धनाने शिवसेनेसाठी काम करू, या भागामध्ये तरुणांचा ओढा शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात आहे. तरुणांना प्रबोधन करून राजकारणामध्ये गतिमान करू असेही आश्वासन याप्रसंगी केंद्रे यांनी दिले.