लाचखोरीत अडकला कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी !!

एसीबी चे संतोष बर्गे पाठवणार का त्याला घरी ?
लातूर जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागासाठी पोलीस उपाधीक्षक म्हणून संतोष बर्गे रुजू झाल्यापासून, या विभागाची कार्यप्रणाली बऱ्याच प्रमाणात बदलल्याची चर्चा आहे. विशेष करून लाचखोर प्रवृत्तीला मोडीत काढण्यासाठी, तक्रारदानाने लाचखोराच्या विरुद्ध तक्रार दिल्यानंतर लाचेची शहानिशा झाली तर आणि रंगेहात पकडलेल्या आरोपीला कशाही स्वरूपातली सूट मिळू नये, अशा उद्देशाने संबंधित खात्याला तात्काळ या गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती देऊन, तपासामध्ये जे साक्षीदार असतील त्यांना संभाव्य अडथळा येणार नाही. किंवा एकूण तपासामध्ये हस्तक्षेप होणार नाही. या उद्देशाने शासकीय कामकाजातून संबंधित पकडला गेलेला आरोपी निलंबित केला जावा, किंवा बडतर्फ केला जावा.अशा पद्धतीचा पत्रव्यवहार ते वरिष्ठांना करतात, आणि कर्म धर्म संयोगाने आज पर्यंत त्यांनी अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या सापळ्यात पकडल्या नंतर घरचा रस्ता दाखवला आहे. ही त्यांची कार्यप्रणाली विचारात घेतल्या नंतर एका कंत्राटी हाय्यक कार्यक्रम अधिकार्याने लाचखोरी केली आणि त्याला अटकही झाली. आता या प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.
महसूल विभागाच्या विविध योजनांच्या संदर्भामध्ये अनेक समज गैरसमज आहेत. विशेष करून रोजगार हमी योजनेच्या बाबतीत तर “रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही” असे सर्रास बोलले जाते.काहीसा तसाच प्रकार रेणापूर तालुक्यातील लाचखोरीच्या घटनेने चर्चेत आणला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, रेनापुर पंचायत समितीमध्ये सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले ज्योतिर्लिंग बाबुराव चिखले या ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एका 31 वर्षीय तरुणाच्या वडिलांचे एक प्रकरण मौजे चाडगाव तालुका रेनापुर येथील असून, सदर प्रकरणांमध्ये तक्रारदार याच्या वडिलांच्या नावाने रोजगार हमी योजनेतून विहीर घेण्यासाठी 5 मार्च 2025 रोजी प्रस्ताव दाखल केलेला आहे. सदर प्रस्तावाच्या अंदाजपत्रकामध्ये चार लाखाचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत. मात्र त्यानंतर एक एप्रिल 2025 पासून मजुरीचे दर वाढल्याने नवीन दरानुसार विहिरीचे इस्टिमेट पाच लाख रुपये झाले आहे, त्यावरून नवीन दरानुसार विहिरीचे इस्टिमेट वाढवून देण्यासाठी, तसेच नरेगा साइटवर तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावांमध्ये सोमवंशी ऐवजी सूर्यवंशी असे चुकीचे नाव झालेले असून त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी, तक्रारदारांनी विनंती केली होती. तेव्हा लोकसेवक ज्योतिर्लिंग बाबुराव चिखले यांनी तक्रारदार यास पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. सदरील मागणी करत असलेली रक्कम ही लाच असून, ते देणे चुकीचे आहे. असे वाटल्यावरून तक्रारदार यांनी 8 मे 2025 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने 13 मे 2025 रोजी पंचाच्या समक्ष लाच मागणीची पडताळणी केली होती. या पडताळणीच्या कार्यवाहीमध्ये आरोपी ज्योतिर्लिंग बाबुराव चिखले यांनी तक्रारदार यांचे शेतीमध्ये नवीन दरानुसार विहिरीचे इस्टिमेट पाच लाखाचे करण्याचे कामासाठी तसेच नरेगा साइटवर तक्रारदार यांच्या वडीलाचे आडनावांमध्ये सोमवंशी ऐवजी सूर्यवंशी चुकीने नाव झालेले असून त्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या कामासाठी तक्रारदार गेले असता, पुन्हा लाचेची मागणी केली. तुम्ही मागत असलेली 15000 ची रक्कम जास्त असल्याचे तक्रारदार यांनी म्हटल्यानंतर “तुझ्या मनाने देऊन जा” असे म्हणून लाचेची रक्कम स्वतः स्वीकारण्यास सहमती दर्शविली.
लाच मागणीची पडताळणी झाल्यानंतर दिनांक 20 मे रोजी पंचा समक्ष सापळा कारवाई रचण्यात आली. यामध्ये आरोपी लोकसेवक ज्योतिर्लिंग बाबुराव चिखली यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम बारा हजार रुपये स्वतः स्वीकारले आहेत. आरोपी ज्योतिर्लिंग बाबुराव चिखले यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ताब्यात घेतल्यानंतर त्यांची अंग झडती घेतली असता लाचेची दिलेली रक्कम बारा हजार रुपये आणि एक मोबाईल फोन त्यांच्याजवळ आढळून आला.
त्यामुळे ज्योतिर्लिंग बाबुराव चिखले यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 प्रमाणे पोलीस स्टेशन रेणापूर जिल्हा लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसेवक आरोपी ज्योतिर्लिंग बाबुराव चिखले याने रेनापुर येथील पंचायत समिती कार्यालयामधील कॅन्टीनमध्ये लाचेची रक्कम स्वीकारली. त्यावेळेस लाच लुचपत प्रतिबंधक पथकाच्या सापळा पथकाने त्यांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास लातूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे हे करत आहेत.
सदरील सापळा कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे, पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक अनवर मुजावर, पोलीस हवालदार फारूक दामटे, भागवत कठारे, भीमराव आलूरे, शाम गिरी, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश कोंडरे , दीपक कलवले, गजानन जाधव, मपोका शहाजान पठाण, परविन तांबोळी, पो. का. शिवराज गायकवा,ड असलम सय्यद, संतोष शिरसागर यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणीही शासकीय शुल्काच्या व्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम मागत असल्यास त्या अनुषंगाने तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्याकडे तक्रार नोंदवावी. तक्रारदार यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. असे आश्वासन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दिले आहे.