लिहित्या हाताला बळ मिळाल्यास प्रोत्साहन – प्रा.डॉ.संभाजी पाटील

0
लिहित्या हाताला बळ मिळाल्यास प्रोत्साहन - प्रा.डॉ.संभाजी पाटील

उदगीर (एल.पी.उगीले)
नवोदित लेखकांसाठी त्यांचं उगमस्थान महत्त्वाचं असतं. अगदी कमी वयात व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस कु.श्वेता हुनसनाले या विद्यार्थिनींने केले आहे. अशाप्रकारे चाकोरी बाहेर विचार करणारे लेखक खूप कमी असतात. श्री हावगीस्वामी महाविद्यालयांनी भविष्यातील एका मोठ्या लेखिका व समीक्षकाला मंच मिळवून दिले. एकंदरीत लिहित्या हाताला बळ दिल्यास नवोदितांना लेखनाची प्रेरणा मिळते. असे विचार राजर्षी शाहू महाविद्यालय, (स्वायत्त) लातूर येथील मराठी विभागाचे प्रमुख डॉ.संभाजी पाटील यांनी व्यक्त केले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बी.कॉम.तृतीय वर्षात शिकणारी कु.श्वेता बळीराम हुनसनाले यांच्या न उमजलेला पुरुष या ग्रंथाचे आभासी स्वरूपात प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एन.जी. एमेकर तर या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. संभाजी पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रंथ चळवळीशी निगडित काम करणाऱ्या कार्यकर्त्या व लेखिका श्रीमती प्रांजली लेले, दिल्ली या उपस्थित होत्या. याशिवाय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.ए. काळगापुरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात बी.ए. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु.श्रद्धा नागरगोजे यांनी “ग्रंथ आमुचे साथी” या गाण्याने केले. प्रास्ताविक डॉ.म.ई. तंगावार यांनी तर लेखिका श्वेता विषयी व पाहुण्यांचा परिचय प्रा.ज्योती संपाळे यांनी करून दिले. न उमजलेला पुरुष हा ग्रंथ समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे. या ग्रंथात लेखिकेचे वास्तववादी विचार आहेत. असे शुभेच्छापर मत उपप्राचार्य डॉ.ए.ए. काळगापुरे यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना डॉ.संभाजी पाटील म्हणाले, न उमजलेला पुरुष या ग्रंथातून श्वेताने अनेक प्रश्न उपस्थित करून विचार करायला भाग पाडले आहे. श्वेताचे लेखन समतोल आहे. ती कोणाला दोष देत नाही. इतरांना दोष देऊन फायदा नाही. पुरुषांना समजून घेत एकमेकांना पूरक बनू या. असा संदेश या ग्रंथातून ती देते. यावेळी ग्रंथातील अनेक संदर्भ देत डॉ.पाटील यांनी विस्ताराने भाष्य केले.
प्रमुख मार्गदर्शक श्रीमती प्रांजली लेले म्हणाल्या, न उमजलेला पुरुष हा ग्रंथ आदर्श कुटुंबव्यवस्था निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. आज विद्यार्थ्यांना दोष न देता त्यांच्यातील गुण ओळखून संधी उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात अगदी स्थिर राहत श्वेता सारासार पद्धतीने विचार मांडते, हे अतिशय कौतुकास्पद आहे. या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे श्वेताने एकांगी विचार मांडलेले नाहीत. अध्यक्षीय समारोपात प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर म्हणाले, श्वेता ही एक चिकित्सक व संवेदनशील विद्यार्थिनी आहे. त्यामुळेच ती अशी उत्तम कलाकृती लिहू शकली. वक्तृत्व व लेखन यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास मोठ्या प्रमाणात होतो. एका नव्या विषयावर श्वेताने स्पष्टपणे विचार व्यक्त केलेले आहेत. आमच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी असे अनेक उपक्रम सातत्याने राबविले जातात.
कार्यक्रमास संभाजीनगर येथील पुरुषांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना उभे करणारे आश्रम या संस्थेचे प्रमुख व पत्रकार भरत फुलारे तसेच गोवा, दिल्ली व महाराष्ट्र या राज्यातील प्राध्यापक, महिला, अभ्यास मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुचिता पाटील तर आभार ग्रंथपाल प्रा.अजित रंगदळ यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!