शिस्तीचे भोक्ते पोलीस अधीक्षक जयंत मीना

0
शिस्तीचे भोक्ते पोलीस अधीक्षक जयंत मीना

लातूर (एल पी उगिले) लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नूतन पोलीस अधीक्षक म्हणून जयंत मीना यांच्या नियुक्तीचे आदेश गृह विभागाने काढले आहेत. जयंत मीना यांना मराठवाड्यातील परभणी येथे कार्य केल्याचा अनुभव आहे. बारामती येथे देखील त्यांनी उत्कृष्ट कार्य केल्याची चर्चा आहे. बारामती मध्ये कार्य करत असताना अवैध धंद्याचे कर्दनकाळ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. आपल्या कार्य कुशलतने अनेक अवैध धंदे करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांनी वचक निर्माण केला होता. बारामती येथे ते अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. परभणी मध्ये असताना देखील अवैध धंद्याच्या विरोधात काम करणारा तरुण अधिकारी अशीच त्यांची प्रतिमा राहिली. अवैध व्यवसायाच्या विरोधामध्ये कंबर कसून धडाकेबाज काम करायचे, कोणत्याही प्रकरणां मध्ये विचार विनिमय आणि बैठका घेण्यापेक्षा थेट कारवाईला प्राधान्य देणारा अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे.
प्रशासनातील कामकाजामध्ये देखील त्यांचा वचक राहिलेला आहे. कामचुकार आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर भूमिका घेऊन त्यांच्यावर कारवाई करायची तर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम ते करतात, अशी त्यांची ख्याती आहे. एक तरुण आणि संवेदनशील मनाचा अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे.
गंगाखेड येथे तत्कालीन समाजवादी पक्षाचे नेते आमदार रत्नाकर गुट्टे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्यामध्ये वाद झाल्याचेही चर्चिले जाते. पुढे आमदार गुट्टे यांनी विशेष अधिकाराचे हानन झाले म्हणून प्रस्ताव विधानसभेमध्ये मांडला होता. त्यावेळेस ही त्यांच्या नावाची महाराष्ट्रभर चर्चा झाली
परभणी जिल्ह्याच्या एकूण कायदा सुव्यवस्थेचा विचार करून जयंती मीना यांनी पोलीस अधीक्षक असताना डीपीडीसीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, तसेच 20 बोलेरो पोलीस प्रशासनाला मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचेही परभणीकर सांगतात.
तसेच अत्यंत कर्तव्य कठोर असलेल्या जयंत मीना यांच्या कार्यक्षेतेमुळे वाळू माफीयांनी केलेल्या खुनाचाही उलगडा मोठ्या शिताफीने तत्कालीन पोलीस प्रशासनाने केला होता. गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रावराजुर तालुका पालम येथील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या माधव त्र्यंबक शिंदे या इसमास लोखंडी रॉड, लाट्या काठ्यांनी मारहाण केली होती. यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर प्रकरणी साम दाम दंड भेद देऊन प्रकरण मिटवण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न झाला होता, मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे लाखो रुपयांचे आमिष देऊन दाबण्यात येत असलेल्या खुनाचा उलगडा झाला, आणि सत्य बाहेर पडले. अशीही चर्चा परभणी जिल्ह्यात झाली होती.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, रावराजुर तालुका पालम येथील वाळू धक्का जिल्हा महसूल प्रशासनाने लिलावात काढला होता, परंतु या ठिकाणी सरकारी नियम मोडून व रात्रीच्या वेळी होणारे वाळू उत्खनन रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या माधव त्र्यंबक शिंदे यांना वाळू माफीयांच्या वतीने मारहाण करण्यात आली होती. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताच्या कुटुंबीयांचा आर्थिक प्रलोभन देऊन संबंधित हा खून दाबण्याचा प्रकार होत होता. यासंदर्भातली माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना समजताच घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन त्यांनी हस्तक्षेप करून मोठ्या पोलीस फौज फाट्यासह सायंकाळी गंगाखेड पोलीस स्टेशन गाठले आणि संपूर्ण प्रकाराचा कसून तपास केला. घटनेतील बारकावे शोधून काढल्या नंतर फिर्यादी श्रावण सोमेश्वर शिंदे यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामीण हद्दी मधून वाळू माफी यांची दादागिरी कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता, त्याला काही प्रमाणात तरी जयंत मीना यांच्या या कामामुळे आळा बसेल, अशी अपेक्षा त्यावेळी व्यक्त केली जात होती.

बारामती मध्ये कार्यरत असताना अवैध धंद्याच्या विरोधात कारवाईचे शतक गाठलेला कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. बारामती कार्यक्षेत्रातील पंधरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुठे कुठे अवैध धंदे चालतात? याची गोपनीय माहिती घेऊन 114 अवैध व्यवसायिकावर कारवाई केल्याचे सांगितले जाते. या कारवाईत त्यांनी तब्बल सात कोटी पाच लाख 45 हजार 906 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. 9 मार्च 2019 रोजी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आठ महिन्यात अवैध धंद्यावर कारवाईचे शतक पूर्ण केले होते. त्यामुळे चांगलाच वचक निर्माण झाला होता. तत्कालीन कोल्हापूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांना कौतुक करून बक्षीस दिले होते.
अशा कर्तबगार आणि अवैध धंद्याचा कर्दनकाळ असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची बदली लातूर जिल्ह्यात झाली असल्याने लातूरकर समाधान व्यक्त करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!