शिक्षक पतसंस्थेच्या सचिवपदी सर्जेराव भांगे, अध्यक्षपदी नंदकिशोर काळे, उपाध्यक्षपदी भरत निलेवाड.

0
शिक्षक पतसंस्थेच्या सचिवपदी सर्जेराव भांगे, अध्यक्षपदी नंदकिशोर काळे, उपाध्यक्षपदी भरत निलेवाड.

उदगीर (एल पी उगिले) तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या २०२५ ते ३० या पंचवार्षिक निवडणुकीत सत्यम शिवम सुंदरम पॅनलचे १२ उमेदवार बहुमताने निवडून आले. पदाधिकारी निवडीच्या वेळी सर्वानुमते चेअरमन म्हणून नंदकिशोर काळे तर उपाध्यक्ष म्हणून भरत निलेवाड, सचिव पदी सर्जेराव भांगे या तिघांची बिनविरोध निवड करण्यात आली. उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेची मे महिन्यात निवडणूक ठरली होती. ही निवडणूक लक्षवेधी ठरली. सर्जेराव भांगे यांच्या नेतृत्वाखाली सत्यम शिवम सुंदरम पॅनल व प्रतिस्पर्धी गटाकडून बहुजन विकास पॅनल या दोन पॅनल मध्ये निवडणूक होऊन त्यामध्ये सत्यम शिवम सुंदरम पॅनलचे १५ पैकी १२ उमेदवार विजयी झाले. तर विरोधकांना ३ जागांवर समाधान मानावे लागले.या निवडणुकीत सर्जेराव भांगे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणाऱ्या पॅनलला पराभूत करण्यासाठी दिग्गजांनी कंबर कसली होती. मात्र सर्जेराव भांगे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पॅनलनेच दणदणीत विजय मिळवला, त्यानंतर बुधवारी झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. पॅनल प्रमुख सर्जेराव भांगे यांची सचिव पदी फेर निवड झाली. सलग सात वर्षे सचिव पद सांभाळून पतसंस्थेला नावलौकिक मिळवून देणारे सचिव सर्जेराव भांगे यांची पुन्हा एकदा सचिव पदी निवड करण्यात आली आहे. पतसंस्थेचे अध्यक्षपदी नंदकिशोर काळे, उपाध्यक्षपदी भरत निलेवाड यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!