कृषी सहायक पाटील यांची बदली करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
ग्रामपंचायत व ग्रामस्थांची तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील नांदगाव हे अगदी हाकेच्या अंतरावर असलेले गाव आहे. या गावच्या कृषी सहायक अधिकारी श्रीमती पाटील या गावामध्ये सतत गैरहजर असतात. गावात त्या महिना दोन महिन्यातून एक ते दोन वेळा येतात. तसेच कृषी विभागाशी संबंधित शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांना देत नाहीत. गावातील शेतकयांनी विविध लाभाच्या योजना, अडचणी संदर्भात फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्या फोन उचलत नाहीत. तसेच गावातील शेतकरी व्हाट्सअप ग्रुप वर विचारणा केली असता समर्पक उत्तर दिली जात नाहीत. नांदगाव या गावाला भेटी देण्यासाठी नियोजित वार हा फक्त मंगळवार नेमून दिलेला आहे. अशी उडवाउडवी ची उत्तरे शेतकऱ्यांना देतात. ऐण पेरणीच्या मोसमात शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अशी तक्रार नांदगाव येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
तालुका कृषी अधिकारी यांनी कोणत्या आदेशान्वये संबंधितांना फक्त मंगळवारीच नांदगाव भेटीसाठी आदेशित केले आहे ते कळवावे तसेच आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांना शेतकरी बांधवासोबत योग्य भाषेत संवाद करण्याचे आदेशित करावे. तसेच संबंधित कर्मचारी सतत गावात अनुपस्थित राहत आहेत त्यामुळे त्यांची बदली इतरत्र करण्यात यावी व कर्तव्य दक्ष कृषी सहायक अधिकारी नेमून देण्यात यावा. तसेच कृषी सहायक अधिकारी पाटील यांच्या वर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालया समोर सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दिला आहे.
