वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपणासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

0
वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपणासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर (प्रतिनिधी) : आपल्या जिल्ह्याला हरित बनविण्याचा संकल्प करत यंदाच्या वटपौर्णिमेला प्रत्येक कुटुंबाने किमान दहा झाडे लावून पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. राज्य सरकारने दहा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, लातूर जिल्ह्यातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेत महिलांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. १० जून रोजी वटपौर्णिमेनिमित्त प्रत्येक कुटुंबातील महिलांनी आपल्या घराच्या अंगणात, परिसरात किंवा गावात किमान दहा झाडे लावून जिल्ह्याला हिरवेगार बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. सामाजिक संस्था, ग्रामपंचायती आणि प्रत्येक व्यक्तीने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणाचे रक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

‘अमृतवृक्ष’ ॲपवर नोंदवा वृक्षारोपणाची माहिती

वटपौर्णिमेनिमित्त लावण्यात येणाऱ्या झाडांची माहिती ‘अमृतवृक्ष’ ॲपवर नोंदवण्याचे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे. यासाठी नागरिकांनी ॲप डाऊनलोड करून मोबाईल नंबर आणि ओटीपीद्वारे नोंदणी करावी. नोंदणी पूर्ण झाल्यावर ‘नया वृक्षारोपण’ पर्यायावर क्लिक करून लावलेल्या झाडांचे नाव, संख्या आणि फोटो अपलोड करता येतील.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!