छत्रपती शाहू महाराज हे दूरदृष्टी राजा होते – प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे
उदगीर (प्रतिनिधी)
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य डॉ रामकिशन मांजरे म्हणाले, कोल्हापूर संस्थानाचे अधिपती छत्रपती शाहू महाराज हे दूरदृष्टीचे राजे होते. बहुजन व अस्पृश्य समाजातील जनतेच्या भावना जागृत करणारे समाजसुधारक म्हणून शाहू महाराजांना ओळखले जाते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी महाविद्यालय उदगीर येथील प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, विभाग प्रमुख प्रा. प्रदीप कोठारे, संतोष चामले, विलास शिंदे, प्रल्हाद येवरीकर, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड हे उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली.पुढे बोलताना प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात शाहू महाराज हे सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी सदैव दक्ष होते. समाजातील दुर्लक्षित मागासवर्गीय दुर्बल घटकांच्याप्रती त्यांचा दृष्टीकोन विशेष सहानुभूती व सुधारणावादी होता. मागासवर्गीय, अपंग, वृध्द, निराधार, दुर्बल इत्यादी घटकांच्या कल्याणार्थ त्यांनी अनेक निर्णय अंमलात आणले त्यांचा आदर्श समाजापुढे विशेषत्वाने यावा, या दृष्टीकोनातून त्यांचा जन्मदिवस दि. 26 जून हा प्रतिवर्षी “सामाजिक न्याय दिन” म्हणुन साजरा करण्यात येतो.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांवर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा प्रभाव होता. महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक सुधारणेचा वारसा खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराजांनी पुढे चालवण्याचे कार्य केले.
विद्यालयातील विद्यार्थी वीर राठोड, सृजन मस्के, आयुष टिळेकर, स्वराज उपासे, अथर्व कुटे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे यांचा अल्प परिचय एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद येवरीकर यांनी तर आभार उमाकांत नादरगे यांनी मानले.
यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील महिंद्रकर, नागेश पंगू, संतोष चामले, मारोती मारकवाड, सुधीर गायकवाड, शिवकुमार कोळ्ळे, विनायक करेवाड, यांनी सहकार्य केले.
