सोशल मीडियाच्या रेट्यामुळे नगरपालिकेला जाग, कचरा अखेर उचलला!
सोशल मीडियाच्या रेट्यामुळे नगरपालिकेला जाग, कचरा अखेर उचलला!
अहमदपूर (गोविंद काळे) : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे अहमदपूर नगरपालिकेला अखेर जाग आली आहे. शहरातील विविध भागांमध्ये साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांबाबत नागरिकांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पोस्ट्सची दखल घेत नगरपालिकेने तातडीने कचरा उचलण्याची मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अहमदपूर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचले होते. यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या. नागरिकांनी याबद्दल नगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या, परंतु परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नव्हती.
यावर उपाय म्हणून शहरातील जागरूक नागरिक गजानन डूब्बेवार यांनी दि २८ जुन रोजी शनिवारी थोडगा रोडवरील कचऱ्याचे फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट केले. ही पोस्ट्स अल्पावधीतच व्हायरल झाली आणि अनेकांनी नगरपालिकेच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त केला. नागरिकांचा हा वाढता रोष पाहून नगरपालिकेच्या प्रशासनाला जाग आली.
रविवारी दि २९ जुन रोजी सकाळीच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कचरा उचलण्यास सुरुवात केली. शहरातील मुख्य रस्ते आणि वस्त्यांमधील कचऱ्याचे ढिगारे हटवण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, सोशल मीडियाच्या ताकदीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
या घटनेमुळे सोशल मीडिया केवळ मनोरंजनाचे साधन नसून, नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ असल्याचे सिद्ध झाले आहे.
