मोबाईल टॉवरच्या नेटवर्क मशीन चोरणारे आरोपी जेरबंद. 3 मशीन हस्तगत.03 आरोपी अटक.
लातूर (एल पी उगिले) लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर रुजू झाल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रामध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. सुधाकर बावकर यांच्या मोठ्या जनसंपर्क आणि तपास यंत्रणेतील कौशल्यामुळे गुन्हा घडला की, लगेच त्याचा तपास लावण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. त्याचाच परिणाम म्हणून लातूर जिल्ह्यातील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या बॅटऱ्या जप्त केल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्ह्यांचा उलगडा करणेबाबत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस ठाणे किनगाव येथे दाखल असलेल्या मोबाईल टावरच्या नेटवर्क मशीन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना दिनांक 3 जुलै ते 4 जुलै च्या मध्यरात्री लातूर शहरातील मळवटी रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून पोलीस ठाणे किनगाव येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील मोबाईल टावरची नेटवर्क मशीनसह इतर दोन मोबाईल नेटवर्किंग मशीन असे एकूण 75 हजार रुपयाचे 3 मशीन जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींची माहिती अशी की, नामे अमोल राम भोसले, (वय 22 वर्ष, राहणार महादेव नगर, लातूर),संदीप राजेंद्र गिरी, (वय 23 वर्ष, राहणार कुंभारवाडी तालुका रेणापूर जिल्हा लातूर), दत्तात्रेय कांतीलाल केकान, (वय 32 वर्ष, राहणार केकानवाडी, तालुका केज जिल्हा बीड).असे असून त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर तीन आरोपींनी त्यांच्या आणखीन एक साथीदाराच्या मदतीने सदरच्या गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस ठाणे किनगाव करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथका मधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अमलदार युवराज गिरी, राहुल सोनकांबळे, सिद्धेश्वर मदने, राहुल कांबळे, जमीर शेख, राजेश कंंचे, गणेश साठे, शैलेश सुडे, अझहर शेख यांनी केली आहे.
