छत्रपती शंभू महाराजांची अध्यात्मिक श्रद्धा आणि चिंतनाचे प्रकटीकरण म्हणजे सात शतक होय – डॉ. दिनेश भिसे
उदगीर (प्रतिनिधी)
लोकजीवन सुखमय, आनंदमय व एकमय बनवण्यासाठी लोकभाषा, लोकसंगीत, लोककला, लोकसाहित्य , लोकगीते आणि लोकराजा अशा विविध संकल्पना शिवकाळात उदयास आल्या. याच काळात छत्रपती शंभू राजांचे बालपण उत्तर भारतात गेले. तेथील लोक जीवनावर गोकुळीचा राणा श्रीकृष्णाच्या लीलांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. परिणामी शंभूराजांच्या साहित्यावर उत्तर भारतीय ब्रजभाषी व राधा श्रीकृष्णाच्या लीलांचा प्रभाव अपसुक पणे जाणवतो. छत्रपती शंभू महाराजांची अध्यात्मिक श्रद्धा आणि चिंतनाचे प्रकटीकरण म्हणजे सात शतक हा ग्रंथ होय असे मत डॉ. दिनेश भिसे यांनी व्यक्त केले.
शिवाजीराव साखरे वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या चला कवितेच्या बनात अंतर्गत च्या 340 व्या वाचक संवाद मध्ये विभागीय अध्यक्ष जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, लातूर डॉ. दिनेश दत्तू भिसे यांनी छत्रपती शंभूराजे लिखित व प्रभाकर ताकवले अनुवादित नायिकाभेद, नखशिख व सातशतक या साहित्यकृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाले की, पराक्रमी व्यक्तीच्या जीवनात शृंगार रस हे त्यांचे भूषणच ठरते. परंतु काही विकृत लोक जाणीवपूर्वक सूर्यापूढे हात धरून इतरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी परंतु तीनशे वर्षांपासून दाबून ठेवलेले छत्रपती संभाजी राजे यांचे साहित्य आज लोकांच्या समोर येत आहे त्याचाच हा एक भाग आहे. शंभूराजांना संस्कृत, फारशी, हिंदी आणि मराठी अशा विविध भाषा अवगत होत्या. त्यांनी सात शतक हा ग्रंथ ब्रिज भाषेतून लिहिलेलं आहे. शंभू, शंभूनृपवर आणि शंभूवर्मन या टोपण नावाने शंभूराजांनी लेखन केलेले आहे. पुढे बोलताना डॉ भिसे यांनी नायिका भेद म्हणजे काय आणि भेदाचे प्रकार सांगत नखशिख या श्रृंगार प्रदान काव्यावरही प्रकाश टाकला. सातशतक या तत्वज्ञान मांडणाऱ्या ग्रंथावर सखोल विवेचन करताना छत्रपती शंभूराजांच्या प्रतिभा संपन्नतेतून समाजात जे जे दिसले, जे जे भावले ते ते आपल्या साहित्यात लिहिले. हे लिहिताना त्यांचा भक्तीभाव अत्यंत सुंदरपणे प्रकट केल. देवता वंदनातून गणेश, शिव पार्वती,भवानी माता आणि राधा श्रीकृष्णाच्या लिला, ईश्वराप्रति असलेली अध्यात्मिक श्रद्धा आणि चिंतन या सर्वांविषयी या ग्रंथात लिहिलेले आहे.
यानंतर झालेल्या चर्चेत अनेकांनी सुंदर चर्चा घडवून आणली यानंतर उपस्थितितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक नेते शिवाजी साखरे यांनी अध्यक्षीय समारोप करताना छत्रपती संभाजी महाराजांचे विविधभाषीय साहित्य , त्यांचा जीवनक्रम आणि नायिकाभेद नखशिख व सात शतक यावरही प्रकाश टाकत असताना संवाद डॉ. भिसे यांनी हा विषय मांडला, त्यांच्या या कौशल्याचे कौतुकही त्यांनी केलं
मुरलीधर जाधव यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमात संवादकांचा परिचय सौ.कांचनताई भिसे यांनी करून दिला तर आभार हणमंत म्हेत्रे यांनी मानले.
