लाखोंच्या संख्येने मराठे मुंबईकडे, ‘चलो मुंबई’चा नारा घुमतोय!
अहमदपूर ( गोविंद काळे ) मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईकडे कूच करत आहे. “आता नाही तर कधीच नाही” असा निर्धार करत मराठा बांधव मुंबई काबीज करण्यासाठी सज्ज झाले आहेत. गावोगावी “चावडी बैठका” घेऊन “चलो मुंबई”ची हाक दिली जात असून या बैठकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मराठा आंदोलनात नेहमीच आघाडीवर असलेल्या अहमदपूर तालुक्यातील समन्वय समितीने २७ ऑगस्टच्या मुंबई मोर्चासाठी जोरदार तयारी केली आहे. तालुक्यातून प्रचंड संख्येने मराठा बांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत.
दलित आणि मुस्लिम समाजाचा पाठिंबा
१९ ऑगस्ट रोजी फत्तेपूर, मुळकी, उमरगा आणि पिंपळवाडी येथील समाज बांधवांनी मुळकी येथे चावडी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत दलित आणि मुस्लिम समाजातील बांधवांनी मराठा समाजाला जाहीर पाठिंबा दिला. “मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आम्ही खांद्याला खांदा लावून सोबत आहोत,” असे त्यांनी जाहीर केले.
या बैठकीत समन्वय समितीचे प्रमुख मार्गदर्शक भीमराव नाना कदम यांनी मुंबई मोर्चाचे नियोजन आणि आवश्यक सूचनांबद्दल मार्गदर्शन केले. या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते दत्ता गलाले, प्रा. डॉ. रोहिदास कदम, शिवव्याख्याते शिवशंकर लांडगे, सिद्धार्थ दापके, श्रीधर तराटे, मुकेश पाटील, नितीन शिंदे, अच्युत भंडे, श्रीरंग पाटील, गोविंद दगडे यांच्यासह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
या बैठकीचे प्रास्ताविक धिरज भंडे यांनी केले, तर सूत्रसंचालन दत्ता जमालपुरे यांनी केले आणि वेंकटराव सूर्यवंशी गुरुजी यांनी आभार मानले. फत्तेपूर, मुळकी, उमरगा, पिंपळवाडी येथील शेकडो मराठा समाज बांधव या चावडी बैठकीत सहभागी झाले होते.
