गणेश उत्सव शांततेत पार पाडून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे: उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांचे आवाहन
अहमदपूर, ( गोविंद काळे): गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलादुन्नबी हे सण शांतता आणि सौहार्दाच्या वातावरणात साजरे करण्याच्या उद्देशाने नुकतीच अहमदपूर पोलीस ठाण्यात शांतता समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांनी गणेश मंडळांना आवाहन केले की, त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.
भातलवंडे यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सणांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांनी मंडळांना कर्कश आवाजाचे डीजे न लावता पारंपारिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. तसेच, विसर्जन मिरवणुकीत केवळ जल्लोष न करता लोकाभिमुख जनजागृतीचे उपक्रम राबवावेत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे असे सूचित केले. गणेश मंडळांनी केलेल्या सहकार्यामुळे शहराला तसेच तालुक्याला कोणत्याही प्रकारे गालबोट लागणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या बैठकीला तहसीलदार उज्वला पांगरकर, नगरपालिका मुख्याधिकारी संतोष लोमटे, आणि पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, मशिदींचे मौलवी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर यांनीही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना कायद्याचे महत्त्व पटवून दिले आणि सर्वांनी नियमांनुसारच सण साजरे करावेत असे आवाहन केले.
सर्व उपस्थितांनी भातलवंडे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ज्यामुळे सलोख्याचे आणि सहकार्याचे उत्तम वातावरण दिसून आले.
