महापुरुषांच्या प्रेरणेनेच आपली व समाजाची प्रगती : माजी मंत्री आ.संजय बनसोडे
उदगीर (एल. पी.उगीले): सामाजिक व राजकीय जीवन जगत असताना सर्व समाज घटकांना सोबत घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणे हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून उदगीर मतदार संघातील जनतेच्या सेवेसाठी गेल्या एक दशकापासून मी अविरतपणे काम करत आहे. त्या कामाची पावती म्हणून आपण सर्वांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार ते कॅबिनेट मंत्री पदापर्यंत पोहोचवला आहात, ही सर्व किमया महामानव विश्वरत्न, प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे झाली आहे. महापुरुषांच्या प्रेरणेनेच आपली व समाजाची प्रगती होत असल्याचे मत राज्याचे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील संविधान नगर येथील नागरिकांच्या वतीने आयोजीत सत्कार समारंभा प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिध्दार्थ सोमवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, राजकुमार भालेराव, गणेश गायकवाड, प्रा.शिवाजीराव देवनाळे, अतनुरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, नागलगावचे सरपंच सुभाष राठोड, प्रदीप पवार, अविनाश गायकवाड, इंद्रजित कांबळे, प्रल्हाद गायकवाड, राजकुमार गंडारे, सतिश कांबळे, शिवा पकोळे, बापू सोळुंके आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी,गेल्या दोन निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे म्हणूनच जास्त मताधिक्य देवून रेकॉर्ड ब्रेक मतांनी आपण सर्वांनी मला निवडून दिलात, आपल्या मतांची जाणिव मला आहे.
मागील काळात उदगीर शहरात बुध्द विहार उभारले व त्याचा लोकार्पण सोहळा हा देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते करुन उदगीरचे नाव जगाच्या नकाशावर आणले. या लोकार्पण सोहळ्याला लाखो लोकांची उपस्थिती होती. भविष्यात आता आपण सिंगापूरच्या धर्तीवर लहान मुलांसाठी उद्यान उभारणार असुन त्याही कामाला आपण लवकरच सुरुवात करणार आहोत. शहरात भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा १५ फुटाचा पुर्णाकृती पुतळा उभारला आहे. त्याच धर्तीवर साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचाही १५ फुटाचा पुर्णाकृती पुतळा उभारणार असून अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने भव्य स्मारक उभारणीचे काम चालु आहे. सर्व जाती धर्माला न्याय देताना आपण मराठा भवन, वीरशैव लिंगायत भवन, शादीखाना, चौकी मठ, श्री हावगीस्वामी मठ, श्री रेणुकाचार्य संस्कार भवन आदी उभारले असुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा उभारला तर संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे काम चालु आहे. मतदार संघात रस्ते, विज, पाणी व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन मतदार संघाचा सर्वांगीण विकास केला असल्याचे आ.बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी संविधान नगर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
