हणमंतवाडी येथे शासकीय वसतिगृहांचे भूमिपूजन; गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळेल: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
चाकूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील हणमंतवाडी येथे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी दोन नवीन शासकीय वसतिगृहे उभारली जात आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन आज सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. या वसतिगृहांमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळतील आणि त्यांच्या प्रगतीला बळ मिळेल, असा विश्वास मंत्री महोदयांनी व्यक्त केला.
यावेळी चाकूरचे नगराध्यक्ष करीम गुळवे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पद्माकर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अलका डाके यांच्यासह अनेक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमता असलेल्या या दोन वसतिगृहांसाठी प्रत्येकी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या दोनमजली इमारतींमध्ये निवास आणि भोजन कक्षासोबतच अद्ययावत ग्रंथालय व अभ्यासिका यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. जागेच्या उपलब्धतेमुळे कामाला विलंब झाला असला, तरी आता हे प्रकल्प लवकरच पूर्ण केले जातील, असे सांगण्यात आले.
मंत्री बाबासाहेब पाटील यांनी वसतिगृहांचे बांधकाम उच्च दर्जाचे असावे, अशा सूचना दिल्या. ते म्हणाले की, सर्व समाजघटकांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या वसतिगृहांमुळे चाकूर भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची उत्तम संधी मिळेल.
या कार्यक्रमात मिलिंद महालिंगे, गोपाळ माने, सिद्धेश्वर पवार आणि विलास पाटील चाकूरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
