२१वे शतक हे संगणक आणि विज्ञानाचे – डॉ. कामाक्षी पवार
अहमदपूर, ( गोविंद काळे): २१ वे शतक हे संगणक आणि विज्ञानाचे युग म्हणून ओळखले जात आहे. जागतिक स्तरावरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन गट संधान केंद्र अहमदपूरच्या विशेष तज्ञ डॉ. कामाक्षी पवार यांनी केले.
त्या यशवंत प्राथमिक शाळेत गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय भारतीय विज्ञान मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विलास चापोलीकर होते. यावेळी श्रीमती इंदुमती जोगदंड, एम. पी. गुंडरे, योगीराज, श्रीमती एम. एम. गुणाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पवार पुढे म्हणाल्या की, तंत्रज्ञान सतत बदलत असते आणि सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार भारताने देखील ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’ सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. हे एक वेगाने उदयास येणारे तंत्रज्ञान असून, जे शास्त्रीय संगणकांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी क्वांटम मेकॅनिक्सच्या नियमांचा वापर करते.
यावेळी ‘क्वांटम युगाची सुरुवात: शक्यता व आव्हाने’ या विषयावर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी. आर. उपाध्ये, श्रीमती पी. ए. सांगवीकर, व्ही. पी. डांगे, गिरी सर, जी. एम. कोइलवाड, श्रीमती पी. सी. राऊत, सय्यद सर आदींनी परिश्रम घेतले.
