’चेअरमन आणि गट सचिव बँकेचा आत्मा’, सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे): विविध कार्यकारी सेवा संस्थांचे चेअरमन आणि गट सचिव हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आत्मा आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच विविध सोसायट्यांची १००% वसुली शक्य होते, असे गौरवपर उद्गार राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर येथे काढले.
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने १००% कर्ज वसुली करणाऱ्या २९ गट सचिव आणि चेअरमन यांच्या सन्मानार्थ आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. हा कार्यक्रम येथील दीपवर्षा मंगल कार्यालयात पार पडला.
व्यवसाय वाढीचे आवाहन
यावेळी बोलताना सहकार मंत्री म्हणाले की, मतदारसंघातील सर्व चेअरमन कायम माझ्यासोबत राहिले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘तुमच्या आशीर्वादामुळेच मला राज्याचा सहकार मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली’, असे त्यांनी कृतज्ञतेने नमूद केले.
ना. पाटील यांनी पुढे सांगितले की, आता विविध सेवा संस्थांनी केवळ कर्ज वाटप आणि वसुलीपुरते मर्यादित न राहता, व्यवसायातही उतरले पाहिजे. विविध प्रकल्पांच्या माध्यमातून सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक बळकट करण्याचे काम चेअरमन आणि गट सचिवांनी हाती घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन महेश पाटील होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये शिवानंद हेंगणे, तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, चेअरमन संग्रामजी चामे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजहरभाई बागवान, गंगाधरराव नागमोडे, अहमदपूरचे फिल्ड ऑफिसर अतुल देशमुख, शिरूर तालुका चेअरमन तुळशीराम भोसले, ॲड. मुंढे, राजकुमार सोमवंशी यांच्यासह अनेक सरपंच, चेअरमन, सेक्रेटरी आणि सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी शिवानंद हेंगणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
