सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा जळकोट नळेगाव दौरा; पूरग्रस्तांना दिला मदतीचा ‘शब्द’
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर ( गोविंद काळे ): महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज (गुरुवार) लातुर जिल्ह्यातील जळकोट आणि नळेगाव परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पूरग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांशी संवाद साधत त्यांना महायुती सरकारच्या वतीने मदतीचा ‘शब्द’ दिला.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नळेगाव येथे अतिवृष्टीची पाहणी केली, तसेच जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा आणि तिरुका या नुकसानग्रस्त गावांना भेट दिली. या भागातील पूरग्रस्त परिस्थिती आणि शेतीत झालेले मोठे नुकसान त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आणि संपूर्ण माहिती घेतली.
मन व्यथित झाले:
नुकसानीची पाहणी करताना मंत्री महोदयांनी सांगितले की, “मेहनतीने उभी केलेली स्वप्ने पाण्यात गेल्याचे चित्र पाहून मन वेदनांनी व्यथित झाले आहे.” या संकटाच्या काळात सरकार तुमच्या सोबत आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला.
पूरग्रस्त कुटुंबियांना भेट व सांत्वन:
या पाहणी दौऱ्यात त्यांनी पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची कामे तातडीने मार्गी लावण्यासंदर्भात सूचना दिल्या.
महायुती सरकारची मदत:
बळीराजाला पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगत, बाबासाहेब पाटील म्हणाले की, महायुती सरकारच्या माध्यमातून सध्या ३१.६४ लाख शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात २ हजार २१५ कोटींची मदत जमा करण्यात येत आहे. शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
