महात्मा गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिवस उत्साहात साजरा
अहमदपूर ( गोविंद काळे) – विचार विकास मंडळ संचलित महात्मा गांधी महाविद्यालयात २४ सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिवस राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ‘युवकांनी कौशल्यवर्धित मूल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज’ असल्याचे मत प्रसिद्धीप्रमुख डॉ. यादव सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
’कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज’
आजचा काळ हा स्पर्धा आणि कौशल्याचा आहे. युवकांना प्रगती साधायची असेल, तर त्यांनी विविध प्रकारची कौशल्ये अंगीकारणे गरजेचे आहे, असे मत प्रमुख पाहुणे डॉ. यादव सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये आत्मसात करण्याची आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधण्याची महत्त्वपूर्ण संधी प्राप्त होते.
डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापनेमागील हेतू, तसेच ‘माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी’ (NOT ME BUT YOU) हे बोधवाक्य समजावून सांगितले. तसेच, राष्ट्रीय सेवा योजनेचे चिन्ह, त्यातील रंग आणि आठ आरे याविषयी सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे विद्यार्थ्यांवर विविध कौशल्ये आणि मूल्यांचे संस्कार करणारी एक महत्त्वपूर्ण संधी आहे, विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अभ्यासाला कौशल्याची जोड हवी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, आजच्या बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील वेगवेगळ्या संधींचा फायदा घेऊन प्रगती साधावी. अभ्यासाला कौशल्याची जोड देणे हीच काळाची खरी गरज आहे, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. बी. के. पाटील, डॉ. पी. एल. देशमुख आणि डॉ. राजश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले. रोहन जाधव या विद्यार्थ्यांने सूत्रसंचालन केले, तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. बी. के. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा विभागाचे स्वयंसेवक आणि कार्यक्रमाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
