महात्मा गांधी महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचे विद्यापीठात ‘वर्चस्व’; प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकावर महाविद्यालयाचे विद्यार्थी
अहमदपूर ( गोविंद काळे) – येथील विचार विकास मंडळ संचलित महात्मा गांधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या (SRTMU) अंतिम वर्षाच्या परीक्षेत दैदीप्यमान यश मिळवत महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, एम. ए. भूगोल या विषयात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठातून थेट प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे सलग तीनही क्रमांक पटकावून एक नवा विक्रम केला आहे.
एम. ए. भूगोल विषयातील ‘अहमदपूर पॅटर्न’
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची एम. ए. अंतिम वर्षाची परीक्षा एप्रिल-मे २०२५ मध्ये झाली होती. नुकत्याच जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीनुसार, भूगोल विषयामध्ये महाविद्यालयाच्या खालील विद्यार्थ्यांनी विद्यापीठात उत्कृष्ट यश संपादन केले:
प्रथम क्रमांक: मोतीपवळे ज्योती शिवराम
द्वितीय क्रमांक: शिंदे शितल अप्पाराव
तृतीय क्रमांक: नागरगोजे उषा नामदेव
एकाच विषयामध्ये एकाच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठातून सलग पहिले तीन क्रमांक मिळवण्याचा हा विक्रम महात्मा गांधी महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने केला आहे.
इंग्रजी विषयातही यश
भूगोल विषयासोबतच, एम. ए. इंग्रजी या विषयातही महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. रत्ना यादव ही विद्यापीठातून सर्व तृतीय (Overall Third) आली आहे. हे सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यापीठाच्या विविध पारितोषिकांचे मानकरी ठरले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
शैक्षणिक गुणवत्तेचा ‘अहमदपूर पॅटर्न’ निर्माण करणाऱ्या महात्मा गांधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले उज्ज्वल यश कायम राखले असून, त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातही गुणवत्तेने आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अँड. किशनराव बेंडकुळे, सहसचिव सुरेशराव देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, आणि भूगोल विभाग प्रमुख प्रो. नितीन देशमुख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी प्रा. श्रीकांत बेंबडे, डॉ. सुचिता जाधव, डॉ. सुनील राठोड, प्रा. वैभव अंधोरीकर यांची उपस्थिती होती.
