महात्मा गांधी महाविद्यालयात गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी: विविध उपक्रमांनी महामानवांना अभिवादन
अहमदपूर( गोविंद काळे): येथील विचार विकास मंडळ संचलित महात्मा गांधी महाविद्यालयात आज, २ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी आणि मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विचार विकास मंडळाचे अध्यक्ष अँड किशनराव बेंडकुळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
महामानवांचे विचार आत्मसात करण्याची गरज
जयंतीनिमित्त प्रा. पी. आर. अर्जून यांचे ‘महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे जीवन आणि कार्य’ या विषयावर महत्त्वपूर्ण व्याख्यान झाले.
अध्यक्षीय मनोगतात अँड किशनराव बेंडकुळे यांनी महात्मा गांधींच्या विचारांचे जागतिक स्तरावर वाढत असलेले महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, “महामानवांच्या विचारांचे पूजन करणे हेच खरे त्यांना अभिवादन आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त केवळ प्रतिमांचे पूजन न करता त्यांचे विचार आत्मसात करणे हीच काळाची खरी गरज आहे.” महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांनी उपस्थित सर्वांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले.
भित्तीपत्रकाचे प्रकाशन, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान
कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या भित्तीपत्रक समितीने तयार केलेल्या ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अहिंसात्मक विचार: काळाची गरज’ या विषयावरील ‘युवाकंप’ या भित्तिपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.
याव्यतिरिक्त, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला विचार विकास मंडळाचे अध्यक्ष अँड किशनराव बेंडकुळे, संस्थेचे सहसचिव श्री सुरेशराव देशमुख, प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
