महात्मा गांधी महाविद्यालयात रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
अहमदपूर ( गोविंद काळे): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील विचार विकास मंडळ संचलित महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी हे शिबीर घेण्यात येते, मात्र यावर्षी विजयादशमीचा सण असल्याने एक दिवस आधी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC), क्रीडा विभाग, विद्यार्थी विकास विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आणि परम कर्तव्य
विचार विकास मंडळाचे अध्यक्ष अँड किशनराव बेंडकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. अध्यक्षीय मनोगतात अँड बेंडकुळे यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “माणसाने कितीही प्रगती केली असली तरी रक्त बनवण्याचा शोध लावू शकलेला नाही. त्यामुळे रक्त हे सर्वश्रेष्ठ आहे. आजच्या तरुणाईने रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन जास्तीत जास्त रक्तदान करावे.”
शिबिराचे उद्घाटक प्रा. ज्योतिर्लिंग शिंदे यांनी रक्तदान केल्यामुळे आरोग्य चांगले राहते, म्हणून प्रत्येक नागरिकाने वयाच्या ५० वर्षांपर्यंत वर्षातून किमान चार वेळा रक्तदान करण्याचा सल्ला दिला. प्रमुख पाहुणे विकास मंडळाचे उपाध्यक्ष विजयकुमार देशमुख यांनी रक्तदान हे केवळ दान नसून ते आपले परम कर्तव्य आहे, असे सांगत बंधुभाव निर्माण करण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन केले.
प्राचार्य डॉ. व्ही.पी. पवार यांनी, “आजच्या धावपळीच्या जीवनात रक्तदानाचे महत्त्व वाढले आहे. अपघातग्रस्त व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी रक्ताची नितांत गरज असते. युवकांनी राष्ट्रीय कर्तव्य समजून रक्तदान करावे,” असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बालाजी पाटील यांनी केले.
४१ पिशव्यांचे रक्तदान, समाजसेवेचा आदर्श
या रक्तदान शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथील रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. मधूरा मुळे, डॉ. अक्षय मून, डॉ. चव्हाण यांच्या वैद्यकीय पथकाने रक्तसंकलनाचे कार्य केले.
या शिबिरामध्ये एकूण ४१ पिशव्या रक्तदान करून समाजसेवा करण्याचे महान कार्य करण्यात आले.
याप्रसंगी विचारमंचावर विचार विकास मंडळाचे पदाधिकारी श्री सुरेशरावजी देशमुख (सहसचिव), श्री रामचंद्ररावजी शेळके (कोषाध्यक्ष), संचालक श्री मधुकरराव देशमुख, श्री भागवत कदम, श्री गोविंदराव हिरवे, तसेच डॉ. आर. एम. कदम, प्रा. हेमंत पाटील, उपप्राचार्य डॉ. जे. पी. कुलकर्णी, स्टाफ सेक्रेटरी डॉ. ए. पी. कांबळे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अनिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच NCC कॅप्टन डॉ. ए. एम. शिंदे, प्रसिद्धी प्रमुख डॉ. यादव सूर्यवंशी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी आणि सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. डी. गुळवे यांनी केले, तर डॉ. विनोद माने यांनी उपस्थितांचे आभार मानले. सुनिल राठोड, दिपक दुर्गे, शंकर शेळके व इतर कर्मचाऱ्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
