महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वतीने शहरात ‘रक्तदान जनजागृती रॅली’चे भव्य आयोजन
अहमदपूर ( गोविंद काळे): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, या उद्देशाने येथील विचार विकास मंडळ संचलित महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वतीने आज दिनांक ३० सप्टेंबर रोजी अहमदपूर शहरातून भव्य रक्तदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
यंदा २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीचा सण आल्यामुळे महाविद्यालयातील रक्तदान शिबिर १ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी नागरिकांना आवाहन करण्यासाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC), क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग आणि विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली.
प्राचार्यांच्या हस्ते हिरवा झेंडा
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. महाविद्यालयातून सुरू झालेली ही रॅली महात्मा बसवेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक, पोस्ट ऑफिस, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर चौक या प्रमुख मार्गावरून थोडगा रोडमार्गे नवजीवन हॉस्पिटलपर्यंत पोहोचली.
रॅलीच्या समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांनी अहमदपूर शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांना या राष्ट्रीय आणि समाजोपयोगी कार्यामध्ये (रक्तदान शिबिरामध्ये) सहभागी होण्याचे नम्र आवाहन केले. त्यांच्या संबोधनानंतर रॅलीची सांगता झाली.
प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या रॅलीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांच्यासह स्टाफ सेक्रेटरी डॉ. ए. पी. कांबळे, एन.सी.सी. (मुली) प्रमुख डॉ. कॅप्टन ए. एम. शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी डॉ. आर. एम. कदम, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अनिल जाधव, प्रसिद्धी प्रमुख डॉ. यादव सूर्यवंशी, हिंदी विभाग प्रमुख डॉ. आर. डी. भामरे, भूगोल विभाग प्रमुख डॉ. एन. टी. देशमुख यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. रॅलीतील फलक आणि घोषणांच्या माध्यमातून ‘रक्तदान श्रेष्ठदान’ चा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.
