अहमदपूरच्या शैक्षणिक इतिहासात सुवर्णाक्षरांची नोंद! वक्तृत्व स्पर्धेत ‘के.जी.एन.’चे सलग चौथे ‘विजयी सिंहासन’काझी मोहियोद्दीन समीयोद्दीनने पटकावले १५,००० रुपयांचे रोख पारितोषिक
अहमदपूर ( गोविंद काळे )
शहरातील खाजा गरीब नवाज उर्दू प्राथमिक शाळा (के.जी.एन.) यशाच्या शिखरावर पोहोचली असून, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात एक अभूतपूर्व विक्रम नोंदवला आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त फैज़-ए-आम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित उर्दू वक्तृत्व स्पर्धेत के.जी.एन. शाळेने सलग चौथ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवत आपला गौरवशाली विजय प्रवास कायम ठेवला आहे.
या स्पर्धेतील ग्रुप अ (५वी ते ७वी) मध्ये के.जी.एन. शाळेचा विद्यार्थी काझी मोहियोद्दीन समीयोद्दीन याने अत्यंत प्रभावी भाषण सादर करत परीक्षकांची मने जिंकली. या घवघवीत यशाबद्दल त्याला १५,००० रुपयांचे रोख पारितोषिक, पदक व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या नेत्रदीपक विजयामुळे शाळेचा आणि अहमदपूरचा सन्मान आणखी वाढला आहे.
’वक्तृत्वाची जननी’: सलग चार वर्षांची यशाची मालिका
के.जी.एन. शाळेच्या या अद्वितीय यशाच्या मालिकेची सुरुवात २०२२-२३ मध्ये झाली होती. चाऊस अफान गालिब (२०२२-२३), चाऊस अफिफ गालिब (२०२३-२४), शेख सबा फिरदोस अय्युब (२०२४-२५) आणि आता काझी मोहियोद्दीन समीयोद्दीन (२०२५-२६) या विद्यार्थ्यांच्या विजयामुळे शाळेने यशाचा चौथा मुकुट आपल्या नावावर केला आहे. या अखंड कामगिरीमुळे के.जी.एन. शाळा आता “वक्तृत्वाची जननी” म्हणून नावारूपास आली असून, सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशामागे मुख्याध्यापक शेख महंमद गौस दाऊद सर तसेच शिक्षकवृंद – सय्यद मुबशिर मख्तार, शेख इमरान अली, काजी समियोद्दीन, सय्यद मुदस्सिर, शगुफ्ता आसमी रजा उस्मानी, कोतवाल नर्गिस आणि निशात मॅडम यांची अथक मेहनत आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन आहे. संस्थेच्या सचिवांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांची उपस्थिती
वक्तृत्व स्पर्धेच्या या कार्यक्रमाचे पहिले सत्र ज्येष्ठ शिक्षक व मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष शेख जिलानी सर यांच्या अध्यक्षतेखाली झाले, तर दुपारच्या सत्राचे अध्यक्षस्थान शिक्षण महर्षी व माजी उपनगराध्यक्ष अब्दुल मुजीब पटेल जागीरदार यांनी भूषवले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे, सामाजिक कार्यकर्ते मोहसीन बायजीद, डॉ. अब्दुल राफे यांच्यासह हबीब मसूद अली, अलीम इसरारसिराज हुसेन, मुंबईचे खान अब्दुल्ला, रजाअली खान लष्करी, मीर अकबर अली, नुसरत कादरी, शेख युनुस सर, शेख मतीन सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रियाज निचलकर व रियाजोद्दीन काझी यांनी केले, तर आभारप्रदर्शन रियाजोद्दीन काझी यांनी मानले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शिक्षकांची मेहनत आणि पालकांचा विश्वास हेच या यशामागील मुख्य घटक आहेत.
