स्वप्निल अण्णा जाधव यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

0
स्वप्निल अण्णा जाधव यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

उदगीर(एल पी उगीले)
उदगीर येथील युवा नेते तथा उद्योजक स्वप्निल अण्णा जाधव यांनी आपल्या राजकीय प्रवासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, आणि उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना भवन येथे पक्षप्रवेश केला.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, जिल्हा समन्वयक प्रकाश हैबतपुरे, शिवसेना उदगीर तालुकाप्रमुख प्रशांत मोरे, शहर प्रमुख बालाजी सोनाळे, तालुका समन्वयक व्यंकट साबणे, शाखाप्रमुख परशुराम विभुते, तालुका सचिव अरुण बिरादार, माजी शहर प्रमुख मुन्ना पांचाळ, उपशाखाप्रमुख माधव शेल्हाळे, जळकोट प्रमुख सारंग आगलावे ,शंकर धोंडापुरे तालुका संघटक, पांडुरंग परीट,राहुल शिवंगे, लक्ष्मण श्रीमंगले, वैभव कदम,सदाशिव शिवपूजे, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
युवा नेते तथा उद्योगपती स्वप्नील अण्णा जाधव यांच्यासोबत सुरज जाधव, हरिबा जाधव, नारायण जाधव, संतोष आदठराव , मारुती जाधव, अमर मोरे, अमोल जोंधळे, शिवानंद सोमवंशी, बालाजी भोसले, अंगद बिरादार, दीपक भोसले, सचिन डावळे यांच्यासह स्वप्निल अण्णा जाधव युवा मंचच्या सर्व शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला.
स्वप्निल अण्णा जाधव यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याने महाविकास आघाडीला नवचैतन्य प्राप्त होणार आहे. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने स्वप्निल अण्णा जाधव यांचा हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा आणि महाविकास आघाडीला बळ देणारा ठरणार आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
स्वप्निल अण्णा जाधव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याबद्दल महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

चौकट……

येणारा काळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असणार आहे – माजी खा. खैरे

सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग चालू आहे. युवकांचा ओढा शिवसेनेकडे वाढला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना हाच पक्ष प्रबळ ठरणार आहे. शिवसैनिकांनी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार समाजामध्ये रुजवणे गरजेचे आहे. गावा गावात शिवसेना आणि घराघरात शिवसैनिक बनला पाहिजे या दृष्टीने सैनिकांनी कामाला लागावे. असे आवाहन शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. ते उदगीर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये प्रवेश दिल्यानंतर उपस्थित नव्याने प्रवेश घेतलेल्या शिवसैनिकांना उद्देशून बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेच्या काळात उद्धव साहेबांनी केलेले काम हे देश पातळीवर नावाजले गेलेले आहे. खऱ्या अर्थाने समाजकारण करण्यासाठी राजकारणाचा उपयोग करणारा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाची वाहवा केली आहे. शिवसैनिकांनी मोठ्या जिद्दीने कामाला लागणे गरजेचे आहे. कोणतेही भूलथपा न देता जनसेवा करून मतदारांना शिवसेनेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

चौकट…..
स्वप्निल जाधव यांच्या संघटन कुशलतेचा शिवसेनेला फायदाच होणार – बालाजी रेड्डी

उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये अल्पावधीत संघटन बांधून नेतृत्व तयार झालेले युवा कार्यकर्ते स्वप्निल अण्णा जाधव यांच्यामध्ये संघटन कुशलता असल्यामुळे पक्ष बांधणीला, संघटन बांधणीला निश्चितपणे त्यांच्या या नेतृत्वगुणाचा फायदा होईल. असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी व्यक्त केला आहे.
ते शिवसेना भवन छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वप्निल जाधव यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर बोलत होते. युवकांनी शिवसेनेच्या सामाजिक जाणीवा जपण्याच्या विचाराला प्राधान्य देऊन मोठ्या संख्येने शिवसेनेत सहभागी व्हावे असेही आवाहन याप्रसंगी बालाजी रेड्डी यांनी केले आहे.

चौकट…..
माझ्या राजकीय जीवनाचे नवी पहाट शिवसेनेपासून सुरू झाली – स्वप्निल अण्णा जाधव

उदगीर विधानस विधानसभा मतदारसंघातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी स्वप्नील अण्णा जाधव युवा मंच, स्वप्निल अण्णा जाधव मित्र मंडळ अशा विविध स्वयंसेवी संघटनेची स्थापना करून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कार्यकर्त्यांनी बळ दिले होते. मात्र आता आपण सर्व शिवसैनिक झाल्यामुळे वेगळ्या संघटनांची गरज उरलेली नाही. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेनेमधूनच समाजकारण करावे, शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे समाजकारणाला प्राधान्य देणारे आहेत. ते मला आवडले, कारण राजकारण करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की, सामाजिक जाणीव असलेल्या एखाद्या राजकीय पक्षाचा आधार असल्याशिवाय राजकारण यशस्वी होऊ शकत नाही, आणि सद्यस्थितीमध्ये समाजातील सर्वसामान्य माणसाचे हित जपण्याची भूमिका विचारात घेऊन काम करणारा नेता म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहेत. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेले काम संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. ते काम खूप आवडले, मी राजकारण करायचे तर अशा सामाजिक जाणीवात जपणाऱ्या माणसाच्या नेतृत्वाखाली करायचे असे ठरवून शिवसेनेमध्ये आलो आहे. आणि मी एकटाच आलो नाही तर माझ्यासोबत माझे सर्व समर्थक देखील शिवसेनेत आलेले आहेत. त्यामुळे स्वप्निल अण्णा जाधव मित्र मंडळ असेल किंवा युवा मंच असेल हे सर्वच आता शिवसेनेचे घटक बनले आहेत. माझ्या या राजकीय प्रवासामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी आणि कैलास भाऊ पाटील यांनी मला राजकारणाची दिशा दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. शिवसेनेचे ध्येयधोरण हे सर्वसामान्य माणसाचे हित जपणे असल्याने माझ्या विचारासी तंतोतंत मिळणारा विचार असल्याने माझे मित्रही त्यामुळेच शिवसेनेमध्ये आलेले आहेत. आता माझ्या राजकीय प्रवासाची नवी सुरुवात करत आहे. आणि मला विश्वास आहे लोकांच्या हितासाठी काम करताना लोक आपल्या सोबत जोडले जातीलच.
शिवसेनेतून काम करण्याची संधी मिळते, हे मी माझे भाग्य समजतो. असे विचार आभार व्यक्त करताना स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!