आदिवासींच्या सामाजिक परिवर्तनाचा प्रेरणादायी दीपस्तंभ म्हणजे बिरसा मुंडा- प्रा.अश्विन वळवी
उदगीर (एल पी उगिले) महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती प्रा. गोपाळ पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून साजरी करण्यात आली. यानंतर भूगोल विभागातील प्रा. अश्विन वळवी यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आदिवासींच्या सामाजिक परिवर्तनाचा प्रेरणादायी दीपस्तंभ म्हणजे बिरसा मुंडा होय. पुढे बोलताना त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांनी त्यांच्या आयुष्यात दिलेल्या अदम्य लढ्याची, आदिवासी समाजाला दिलेल्या स्वाभिमानाची, जल-जंगल-जमिनीच्या संरक्षणासाठी केलेल्या क्रांतिकारी आंदोलनाची, ब्रिटिश सत्तेविरोधात उभारलेल्या उलगुलान या धगधगत्या संघर्षाची आणि अल्पवयातच लोकनायक म्हणून उभ्या राहिलेल्या त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याची भूमिका स्पष्ट केली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य मस्के म्हणाले की, वेदनेतून विद्रोह निर्माण होण्याचं उदाहरण म्हणजेच बिरसा मुंडा होय. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे आणि डॉ. एस. जी. कोडचे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी बी. एस. होकरणे, पर्यवेक्षक एस. व्ही. मुडपे तसेच प्राध्यापक, कार्यालयीन व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार यांनी तर आभार दिनविशेष समिती प्रमुख डॉ. एम. एस. खांडेकर यांनी मानले.
