एम आय एम पक्ष खरा दावेदार – माजी खासदार इम्तियाज जलील
उदगीर ( एल पी उगिले) उदगीर नगर परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने एम आय एम पक्ष खरा दावेदार आहे. मागील निवडणुकांमध्ये आपसातील मतभेद आणि काही गैरसमजातून निसटता पराभव झाला. गेल्या वेळेस झालेल्या चुका दुरुस्त करून नव्या उमेदीने आपण पुढे जाऊ या. उदगीर शहरातील सभेसाठी इतक्या मोठ्या संख्येने जनसैलाब उपस्थित झाला आहे. यावरूनच “शहर भी हमारा और मेअर भी हमारा”हा नारा एमआयएम साठी योग्य वाटतोय. भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्यासाठी इतका मोठा जनसमुदाय उपस्थित राहू शकत नाही. एम आय एम वर प्रेम करणारा वर्ग फार मोठा आहे. तीच खरी एमआयएमची ताकद आहे.
बिहारमध्ये आपल्या पक्षाला मोठे यश आले. त्यात सर्वांचेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दुवा आणि आशीर्वाद आहेत. असे विचार एम आय एम चे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.
ते उदगीर येथील भाजी मंडई चौकात एमआयएमच्या प्रचाराचा शुभारंभ करताना सभेला उद्देशून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, एम आय एम ला सत्ता दिल्यास विकासाला गती देऊ शकतो. जनतेच्या प्राथमिक गरजांना प्राधान्य देऊन आपण शहराचा विकास घडवून आणू या. प्रत्येक उपेक्षित राहिलेल्या प्रभागाचाही विकास झाला पाहिजे, असा अट्टाहास आपला राहील. यावेळी निश्चितपणे एम आय एम चा नगराध्यक्ष बनेल असा विश्वासही इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला.
या प्रचार सभेचे प्रस्ताविक एमआयएम चे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान उमेदवार सय्यद ताहेर हुसेन यांनी केले. एम आय एम पक्षाच्यावतीने विकासाच्या संदर्भामध्ये त्यांनी आपले विचार जनतेच्या समोर मांडले.
चौकट……
अनेकांचा एम आय एम मध्ये पक्षप्रवेश….
उदगीर शहरातील विविध व्यापारी आणि उद्योगपतींनी इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये एम आय एम पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाला संबोधून बोलताना इम्तियाज जलील यांनी सांगितले की, एमआयएम बद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड प्रेम निर्माण झाले आहे. तरुणांनी एमआयएमची ध्येय धोरणे शहरातील प्रत्येक घरापर्यंत आणि घरातील प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तरुण कार्यकर्त्यांची आहे. आणि आता सर्व कार्यकर्ते पेटून उठतील आणि पक्ष संघटन बांधणीसाठी युद्ध पातळीवर काम करतील, असा विश्वास आहे. एम आय एम कडे आकर्षित होणाऱ्या तरुण आणि वयोवृद्ध नागरिकांची गर्दी पाहिल्यास निश्चितपणे या पुढे एम आय एम ला चांगले दिवस येणार आहेत. असा आपल्याला विश्वास आहे. असेही सांगितले.
