उदगीर(प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती उदगीर जिल्हा लातूर व भारतीय बौद्ध महासभा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन गुगल मीटवर संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उदगीर येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयiचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. दत्ताहरी होनराव यांनी सविस्तरपणे भारतीय संविधान आणि आजचे वास्तव या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी होनराव यांनी संविधानातील उद्देश पत्रिका आशय मूल्य आणि आजचे वास्तव याविषयी विचार मांडताना सांगितले की, भारतीय संविधान हे जगण्याचे साधन बनावे. आमच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग बनावे. आजच्या वास्तवासंदर्भात भाष्य करताना ते पुढे म्हणाले की, भारतीय संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य आहे. परंतु आज राजे आणि राज्य हे धर्माच्या नावावरच निर्माण होत आहेत. एका बाजूला मंदिरांची संख्या वाढताना आम्ही पाहत आहोत, तर दुसऱ्या बाजूला शिक्षकांना पगार देण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत. सरकार शाळा बंद करण्याचा घाट घालत आहे. लोकांनी प्रश्न विचारूच नये अशा प्रकारची आजची व्यवस्था आहे. मतदार पैसे घेऊन मॅनेज होत आहेत. तेव्हा प्रत्येक संविधान प्रेमी नागरिकांची जबाबदारी आहे. लोकशाही वाचवण्याची, लोकशाही टिकविण्याची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये बोलताना सांगितले होते की, संविधान कितीही चांगले असले तरी त्याची श्रेष्ठता अंमलबजावणी करणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे. याप्रसंगी सकाळी ठीक सात वाजता गुगल मीटवर अनेकांनी या व्याख्यानाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब घाटे गुरुजी यांनी केले, या कार्यक्रमासाठी भारतीय बौध्द महासभा जालनाचे कुणाल दहिवले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, उदगीर शाखेचे उपाध्यक्ष विश्वनाथ मुडपे गुरुजी, बाबुराव माशाळकर, बळीराम भुकत्तरे , शिरीष रोडगे, गंगाधर घुमाडे, ज्योतीताई डोळे, सुरेश लांडगे, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर इत्यादींनी परिश्रम घेतले. तसेच आभार प्रदर्शन अनिस उदगीर शाखेचे उपाध्यक्ष बाबुराव माशाळकर यांनी केले.