अनंत कदम यांच्या वाचक संवाद चळवळीचा “रावसाहेब पाटील साहित्य” पुरस्काराने गौरव
उदगीर (प्रतिनिधी)
प्रसिद्ध कथा कादंबरीकार सुरेंद्र पाटील यांनी आपल्या वडिलांच्या नावाने “रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार” ठेवला आहे. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिक, संस्था किंवा व्यक्तीसाठी पाच हजार रुपये, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून त्यासाठी कसलीही प्रवेशिका, निवड समितीचे अवडंबर नाही. पुरस्कारप्राप्त व्यक्तीपर्यंत जाऊन हा पुरस्कार सन्मानपूर्वक दिला जातो. २०२६साठी हा पुरस्कार २००७पासून चला कवितेच्या बनात माध्यमातून वाचन चळवळीचे कार्य करणाऱ्या अनंत चंपाई माधव कदम यांना जाहीर केल्याचे सुरेंद्र पाटील यांनी कळवले आहे.
अनंत कदम हे एक उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी वाचन चळवळीची गरज लक्षात घेऊन जून २०११ पासून ‘वाचक संवाद’ हा उपक्रम सुरु केला तो आजही समविचारी मित्रांना घेऊन अखंडपणे चालू आहे. आत्तापर्यंत ३५१ वक्त्यांनी त्यांच्या या उपक्रमात हजेरी लावलेली आहे. म्हणजेच ३५१ पुस्तकावर ३५१ संवादकांनी ‘वाचक संवाद’ मध्ये संवाद साधलेला आहे. त्यांच्या या यशस्वी उपक्रमशीलतेमुळे त्यांची निवड केल्याचे सुरेंद्र पाटील यांनी सांगितले. येत्या जानेवारीमधे त्यांच्या घरी जाऊन अनंत कदम यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे.या पुरस्काराने अनंत कदम यांच्या कार्याची दखल घेतल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
