वनस्पतीशास्त्र विभागात ‘वनस्पति ताण व्यवस्थापन’ विषयावर राष्ट्रीय स्तरावरील व्याख्यान
उदगीर (एल पी उगिले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे गोवा विद्यापीठ, गोवा येथील जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रा. डॉ. श्रावणी कोरगावकर यांचे ‘वनस्पति ताण व्यवस्थापन’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील व्याख्यान यशस्वीपणे संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवशंकर हल्लाळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. राहुल अल्लापूरे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्रा. अश्विनी भाताडे यांनी करून दिला. यावेळी साधन व्यक्ती म्हणून बोलताना डॉ. श्रावणी कोरगावकर यांनी भात संशोधन व हवामान बदल या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. बदलत्या हवामान परिस्थितीत वनस्पती कशा प्रकारे तग धरून राहतात, त्या परिस्थितीनुसार कशी प्रतिक्रिया देतात? तसेच कोणती जीवरसायने वनस्पतींना ताण सहन करण्याची क्षमता प्रदान करतात. याचे शास्त्रीय विवेचन त्यांनी केले. ताण सहन करण्यासाठी सॅलिसिलिक आम्ल हे महत्त्वाचे रसायन असून ते वनस्पतींमध्ये संरक्षणात्मक भूमिका बजावते, असेही त्यांनी नमूद केले. पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी कृषी नवोपक्रमांकडे वळावे, जेणेकरून नवनवीन पिकांच्या जाती विकसित करता येतील, असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. शिवशंकर हल्लाळे यांनी भाताच्या विविध प्रजाती तसेच ताण व्यवस्थापन यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. राहुल अल्लापूरे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. शैलेश ममदापुरे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
