आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्या – प्रा.सौ. मनीषा पाटील
उदगीर (प्रतिनिधी)
एकोणीसाव्या शतकात ब्रिटीश काळात ब्राह्मणशाहीने जात,धर्म या नावाखाली बहुजन समाजाला गुलाम केले होते. शिक्षणापासून इतरांना वंचित ठेवले होते. अशा काळात सावित्रीबाई फुले या भारताच्या आद्य शिक्षिका बनल्या, अनंत संकटांचा मुकाबला करून त्यांनी आपले ध्येय साध्य केले असे उद्गार सौ मनीषा पाटील यांनी काढले. त्या छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात एकोणीसाव्या शतकातील भारतीय शिक्षणाच्या आद्य जनक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आयोजित केली होती त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम.मांजरे होते.तर विचार मंचावर दिलीप पाटील, प्रबंधक बी. के.पाटील, अधिक्षक व्ही. डी. गुरनाळे उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना सौ.पाटील म्हणाल्या की, सावित्रीबाईंनी अशा काळात मुलींच्या शिक्षणासाठी द्वारे खुली केले. अंगावर शेण-चिखल, दगड-गोटे घेवून त्यांनी शिक्षिका म्हणून शाळेत कार्य केले. साहित्य निर्मिती करुन आपल्या कवितेतून समाज प्रबोधन केले असेही त्यांनी म्हटले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ.मांजरे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी अग्निफुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहिले.महात्मा फुले यांच्या त्या धर्मपत्नी होत्या. सबंध आयुष्यभर त्यांनी ज्योतिरावांच्या कार्याला साथ दिली.ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले हे भारतातील आदर्श दाम्पत्य होते.बहुजन समाजाचे नायक होते असे म्हटले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती समिती प्रमुख तथा मराठी विभाग प्रमुख डॉ.सुरेश शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहसंयोजक प्रा.डॉ.डी.बी. मुळे यांनी केले.या कार्यक्रमाला प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम जयंती समितीच्या वतीने घेण्यात आला.
