जागरूक ग्राहक हाच बाजारपेठेचा राजा असतो-डॉ. डी.बी. कोनाळे
उदगीर (एल पी उगिले) ग्राहकांना सदोष उत्पादने, सदस्य सेवा आणि अनुचित व्यापार पद्धती पासून संरक्षण देण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बनविण्यात आला आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश ग्राहकांच्या हक्काचे प्रभावी संरक्षण करणे व तक्रार निवारण करणे हा आहे. त्यासोबतच या अंतर्गत ग्राहकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण ग्राहक दक्ष राहिला पाहिजे. त्याला आपल्या हक्काची जाणीव असली पाहिजे.जागरूक ग्राहक हाच बाजारपेठेचा राजा असतो, असे मत डॉ. डी. बी. कोनाळे यांनी व्यक्त केले. ते छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय, उदगीर व तहसील कार्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर हे होते, तर व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे, ग्राहक पंचायत लातूरचे दत्तात्रय मिरकले पाटील, इत्यादी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. कोनाळे यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 व नवीन कायदा 2019 मधील तरतुदी सांगितल्या. तसेच डिजीटल न्यायप्रणालीद्वारे कार्यक्षम आणि जलद न्याय यासाठी ऑनलाईन तक्रार पोर्टल – ई दाखील – ई जागृती यांचा प्रभावी वापर यावर माहिती दिली. याप्रसंगी डॉ. आर. एम. मांजरे व मिरकले पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात तहसीलदार राम बोरगावकर यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्त्व स्पष्ट केले. प्रा बालाजी सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर सुमित्रा इलमले यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी शहरातील व्यापारी,आशा कार्यकर्त्या व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
