भाजपने ते रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या वैचारिक दळभद्री पणाचे प्रदर्शन केले – विवेक जाधव
उदगीर (एल पी उगिले) लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसण्याबाबत केलेले वक्तव्य हे केवळ दुर्दैवी नसून, भाजपची वैचारिक दारिद्र्य आणि इतिहासा विषयीची असहिष्णुता उघड करणारे आहे. असे विचार युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विवेक जाधव यांनी व्यक्त केले आहे.
पुढे बोलताना विवेक जाधव म्हणाले की,निवडणूक जिंकण्यासाठी लातूरच्या विकासाचा इतिहास नाकारण्याचा प्रयत्न करणे, हे राजकीय अपयश झाकण्याचे हतबल प्रयत्न आहेत. ज्यांनी लातूरला राज्य आणि देशाच्या नकाशावर सन्मानाने उभं केलं, त्या नेतृत्वाविषयी अशी भाषा करणे म्हणजे लातूरकरांच्या अस्मितेचा थेट अपमान होय.
स्व. विलासराव देशमुख साहेब हे केवळ एका पक्षाचे नेते नव्हते, तर विकास, समन्वय आणि सुसंस्कृत राजकारणाचा विचार होते. त्या विचाराला पुसण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी लातूरसाठी स्वतःचं योगदान काय आहे? याचं आत्मपरीक्षण करावं.इतिहास पुसण्याची भाषा ही कमजोरीचं लक्षण असते; मजबूत नेतृत्व कधीच अशा भाषेचा आधार घेत नाही. लातूरची जनता कोण विकासाचा वारसा घेऊन चालते आणि कोण केवळ वादग्रस्त वक्तव्यांवर राजकारण करत आहे, हे चांगल्या प्रकारे ओळखते.
भाजप नेतृत्वाने अशा जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींकडून येणाऱ्या बेजबाबदार वक्तव्यांवर भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा लातूरकरांचा संताप आणि त्याचा राजकीय परिणाम अटळ राहील. असा इशारा या प्रसंगी विवेक जाधव यांनी दिला आहे.
