वाढवणा गटातून नागोराव चिमनदरे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील – कल्याण पाटील
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर तालुक्यातील अत्यंत अटीतटीच्या समजल्या जाणाऱ्या सातही जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व निर्माण होईल. अशी परिस्थिती आहे. अत्यंत कर्तबगार आणि जनतेच्या सेवेमध्ये धावून जाणारे आणि विकासाची जाण असलेले उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत. जिल्ह्यात सर्वात बहुचर्चित असलेल्या वाढवणा जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नागोराव चिमंदरे हे प्रचंड मताधिक्याने विजय होतील. असा विश्वास काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव कल्याणराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद रॅलीमध्ये ठीक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर बैठका मधून ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, नागोराव चिमंदरे यांनी हाळी हंडरगुळी या मोठ्या बाजारपेठ असलेल्या गावातील कित्येक प्रश्न सोडवलेले आहेत. हाळीचे सरपंच असताना त्यांच्याच कार्यकाळात पाणीपुरवठा योजना यशस्वी झाली, रस्ते, नाल्या, स्वच्छता यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. स्वच्छतेच्या बाबतीत आणखी बरेच काही करण्यासारखे आहे. आज पर्यंत सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखा मध्ये धावून जाणारा माणूस म्हणून नागोराव चिमनदरे यांची ओळख आहे. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून ते आज पर्यंत काम करत आहेत. पक्षश्रेष्ठींचा आदेश प्रमाण मानून काम करणारा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे.
स्थानिक चा उमेदवार म्हणून जिल्हा परिषद गटातील बहुतांश गावातून त्यांचे स्वागत केले जात आहे, मी या परिसरातला असल्यामुळे प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक घरातील माणसाशी आमचे स्नेहाचे ऋणानुबंध आहेत. हा मतदारसंघ म्हणजे कोणीही यावे आणि टिकली मारून जावे असा मतदारसंघ नाही. या मतदारसंघाने आम्हाला दहा वर्ष साथ दिलेली आहे. आणि या वेळेस देखील मोठ्या मताधिक्याने आमचा विजय होईल, असा आम्हाला विश्वास आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद गटाचे उमेदवार नागोराव चिमनदरे यांनी याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले की, वाढवणा जिल्हा परिषद गट हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. कल्याणराव पाटील यांच्या कार्याचा ठसा या मतदारसंघावर आहे. त्यांनी केलेली विकास कामे आजही लोक आवर्जून सांगतात. नेतृत्वाने केलेल्या विकास कामाचा फायदा जिल्हा परिषद गटाच्या उमेदवाराला आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवाराला निश्चितपणे होणार आहे. आणि मला खात्री आहे, हाळी आणि हंडरगुळी ही दोन्ही गावे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्याचबरोबर आजूबाजूच्या वाडी, तांड्यावर देखील माझ्या ऋणानुबंधातील कित्येक लोक आहेत. वाढवणा पंचायत समिती गणात देखील माझे संबंध आहेत. मी केलेल्या कामाची जाणीव त्या लोकांना आहे, तसेच पंचायत समिती गणा मधून दत्ता बामणे यांनी यापूर्वी विकास कामे केलेली आहेत, यावेळेस त्यांच्या सुविद्य पत्नी उमेदवार असल्या तरी दत्ता बामणे यांच्या कार्याचा विचार करून जनता त्यांना आणि मला बहुमत देतील अशी खात्री आहे. दोन्हीही पंचायत समिती गणातील कर्तबगार उमेदवार माझ्यासाठी निश्चित मोठा पाठिंबा ठरणार आहे. असाही विश्वास याप्रसंगी नागोराव चिमनदरे यांनी बोलून दाखवला.
