“जननायक” या पुरस्काराने नामदेवराव कदम सन्मानित
उदगीर (एल. पी. उगीले) : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा आरोग्य दूत म्हणून ओळखले जाणारे “नामदेवराव कदम” यांना उदगीर येथील मानव विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने “जननायक” हि उपाधी आचार्य द्रविड शास्त्री महाराज यांच्या शुभेच्छा संदेशासह भागवताचार्य मुकुंद महाराज देवताळकर यांच्या शुभहस्ते प्रदान करून नामदेवराव कदम यांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी मनोजजी तोमर, महामंडलेश्वर ममता दास, न्यायशास्त्र भागवताचार्य मुकुंद महाराज देवताळकर, सुप्रसिद्ध साहित्यिक अश्विनीताई रानडे या मान्यवरांच्या उपस्थितीत ही पदवी प्रदान करण्यात आली.
मानव विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उदगीर परिसरात विविध क्षेत्रातील इतरही अनेक मान्यवरांना त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्राप्रमाणे ट्रस्टच्या वतीने गौरवान्वित करण्यात आले. यामध्ये कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल ज्ञानेश्वर मोरे, उद्योग क्षेत्रासाठी अमित गुडसूरकर, समाज हित कार्यासाठी “कारवा ग्रुप” आणि “पेडल टू गो” या ग्रुपला तसेच समाजसेवी कार्याबद्दल लक्ष्मण रेड्डी, साहित्य क्षेत्रासाठी अनंत कदम तर पत्रकारितेसाठी सुनील हवा यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच नाट्य क्षेत्रासाठी विवेकजी होळसंबरे यांना “श्री सेवा” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर उदगीर व लातूर जिल्ह्यातील नामांकित कलावंतांचे गायन, अभिनय, कथ्थक, भरतनाट्यम अशा विविध कलाक्षेत्रातील जाणकारांचे कला सादरीकरण ही संपन्न झाले. तसेच “श्री सेवा” प्रकल्पांतर्गत चालणाऱ्या विद्याश्री पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचेही विविध कला गुणदर्शन या ठिकाणी सादर करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कारही याप्रसंगी करण्यात आला.
