अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरपाई देण्याची मागणी
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे बागायती शेती सोबतच वादळी वारा आणि विजा मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा उदगीर नगर परिषदेचे माजी नियोजन सभापती, नगरसेवक निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी केली आहे.
उदगीर तालुक्यात आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी बऱ्याच बागायतदार शेतकऱ्यांनी आंब्याची बागायती शेती केली आहे. ऐन मोसमात अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे आंब्याच्या बोगेचे अतोनात नुकसान झाले आहे. तोंडाला आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. अगोदरच दुष्काळाने होरपळलेला शेतकरी, त्यात पुन्हा कोरोनामुळे संचार बंदी आणि लॉकडाऊन यामुळे मोठ्या आर्थिक गोचीत सापडलेल्या शेतकऱ्याला या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने चांगललेच झोडपून काढले आहे.
एकाबाजूला बागायती शेतीचे नुकसान तर दुसर्या बाजूला विजांच्या कडकडाटात मुळे जनावरे दगावली आहेत. यात प्रामुख्याने हाळी हंडरगुळी परिसरात धुपे वैजनाथ यशवंत रा. हंडरगुळी यांची देवणी जातीची कालवड,सौ. सुशिलाबाई नवनाथ वाघमारे रा. हंडरगुळी यांची मुर्हा जातीची म्हैस, चांद पाशा माणिकशा शेख रा. हाळी यांची मुर्हा जातीची म्हैस तर शिवाजी शंकर काळे रा. हाळी यांचा बैल वीज पडल्यामुळे मृत्यू पावले आहेत. पशुधन हे शेतकऱ्यांसाठी लाख मोलाचे असून अचानक अवकाळी पाऊस आणि विजांचा कडकडाटातून मोठी हानी झालीआहे.या मुळे त्या शेतकऱ्यांना तात्काळ अर्थसाह्य केले जावे. अशी मागणी राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी केली आहे.
