ना संजय बनसोडे यांनी विकासाला अध्यात्म आणि संस्काराचे जोड दिली – शिवराजआप्पा नावंदे महाराज
ना संजय बनसोडे यांनी विकासाला अध्यात्म आणि संस्काराचे जोड दिली - शिवराजआप्पा नावंदे महाराज
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास होत असताना त्या विकासाला अध्यात्माची आणि सुसंस्कृत समाज रचनेची जोड कशी देता येईल? याचा प्राधान्याने विचार करून भौतिक सुख सुविधा देत असतानाच समाजामध्ये सुसंस्कार आणि संस्कृतीची जोपासना झाली पाहिजे. अशा विचाराने ना. संजय बनसोडे यांनी केलेला सर्वांगीण विकास लाखमोलाचा आहे. या ऐतिहासिक विकासाची जाण ठेवत उदगीरच्या जनतेने ना. संजय बनसोडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे. असे आवाहन शि. भ. प. शिवराज आप्पा नावंदे महाराज यांनी केले.
ते उदगीर येथील कॉर्नर सभांमध्ये बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे,माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, माजी नगराध्यक्ष सुधीर भोसले, सय्यद जानीमिया, शशिकांत बनसोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना नावंदे महाराज म्हणाले की, विकासाचा डोंगर उभा करून सर्व जाती धर्माच्या आणि समाजाच्या गरजा विचारात घेऊन विकास निधी खेचून आणणारा विकास पुरुष संजय बनसोडे यांच्या सारखा नेता उदगीरच्या जनतेला पाहिजे आहे. अशा पद्धतीने विकासाची गंगा खेचून आणणारा भगीरथ जनतेच्या हितासाठी नेता होणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल पन्नास वर्षाचा विकासाचा बॅकलॉग त्यांनी भरून काढला आहे. सर्वसामान्य माणसाला जे जे लागेल ते ते उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले आहेत. इतकेच नाही तर रेणुकाचार्य भवन उभारून समाजामध्ये सुसंस्काराचे बिजारोपण करता येईल, इतकी दूरदृष्टी त्यांनी ठेवली आहे. प्रत्येक समाजासाठी त्यांचे श्रद्धेय ठिकाण असलेल्या जागेवर समाज मंदिर असेल, मंगल कार्यालय असेल, प्रार्थना स्थळ असेल त्या त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न लाख मोलाचे आहेत. त्यामुळे अशा नेतृत्वाला जपणे हे जनतेचे आद्य कर्तव्य आहे. मी वारकरी संप्रदायाचा जरी असलो तरीही असे नेतृत्व जपले पाहिजे म्हणून मी राजकीय विषयावर बोलत आहे. कारण धर्म सत्तेला राजसत्तेबद्दल बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि तो बोलत असताना पूर्ण संयमाने मी बोलतोय की असे नेतृत्व जपणे समाज हिताचे आहे, आणि उदगीरची सुजाण जनता या गोष्टीला प्राधान्य देऊन महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य आपल्या लाडक्या नेत्याला देतील असा विश्वासही मला आहे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी बोलताना राजेश्वर नीटूरे यांनी संजय बनसोडे यांच्या विकास कार्याचा आढावा घेतला. तसेच प्रतिस्पर्ध्यांनी दहा वर्षाच्या काळात किमान दहा तरी कामे केली आहेत का? असा प्रति प्रश्न केला. याप्रसंगी माजी आमदार गोविंद केंद्रे यांनीही आपल्या खुमासदार शैलीमध्ये प्रतिस्पर्ध्यांचा समाचार घेतला.
प्रचंड जनसमुदायाला संबोधित करताना क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की, मी जनसेवक म्हणून काम करत आहे, आणि भविष्यातही जनसेवक म्हणूनच मी काम करणार आहे. पदे येतात जातात मात्र पद असताना जनसेवेसाठी काय केले हे फार महत्त्वाचे असते. याची जाणीव ठेवून जे जे नवे ते माझ्या उदगीरला हवे या भावनेने मी काम केले आहे. आणि माझ्या कामाची दखल घेऊन उदगीरकर मला न्याय देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सय्यद जानीमिया यांनी केले.
