साहित्यिक डॉ.कदम नरसिंग यांचा सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयातील साहित्यिक डॉ.नरसिंग कदम यांची मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबईच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल, त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल तसेच सामाजिक,शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचे चाललेले मोठे योगदान याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.सत्कार प्रसंगी शामार्य कन्या विद्यालयातील संस्कृत विषयाचे अध्यापक हुरदळे आनंद, श्यामलाल विद्यालय मधील संस्कृत विषयाचे अध्यापक कावरे प्रमोद, पशुधन पर्यवेक्षक डॉ.सुरेश चव्हाण, परिवर्तन अकॅडमीचे संचालक नरसिंग गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हुरदळे आनंद होते.सत्कार प्रसंगी डॉ.सुरेश चव्हाण म्हणाले, प्रा. कदम हे आमचे जुने मित्र आहेत. सामाजिक जाणिवांचं भान त्यांना खूप चांगल्या पद्धतीने आहे.यावेळी कावरे प्रमोद म्हणाले, साहित्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कदम कार्य करत आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. तर नरसिंग गोरे म्हणाले साहित्यामध्ये काम करत असताना खूप मोठी साधना लागते. ती साधना प्राप्त केल्यामुळेच साहित्य लेखनाला प्रेरणा मिळत आहे. सत्काराला उत्तर देताना साहित्यिक डॉ.कदम म्हणाले, कोणतेही कार्य करत असताना आपण स्वतःला वाहून घ्यावे लागते. वेळ द्यावा लागतो, साधना करावी लागते. तेव्हाच आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. अध्यक्षीय समारोपप्रसंगी हुरदळे म्हणाले, साहित्य क्षेत्र हे खूप परिश्रमातून प्राप्त होत असते. साहित्यिकाला सामाजिकतेचे भान असतं, जाण असते. त्यावेळेसच त्यांचे लेखनी चालू शकते. असेही यावेळी ते म्हणाले.यावेळी कार्यक्रमास मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
