किरकोळ वादावरून खून उच्च न्यायालयात जामीन
छत्रपती संभाजीनगर: (प्रतिनिधी) उच्च न्यायालयाचे न्या. अभय एस.वाघावसे यांनी आरोपी सलमान जिलानी पठाण यास खून खटल्यात जामीन दिला आहे. प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, समता नगर उदगीर येथील रहिवासी फिर्यादी निर्मला बळीराम सांगवे यांनी त्यांचे पती बळीराम सांगवे यांच्या एर्टिगा कार चे हॉर्न जोरात का वाजवले या कारणाने झालेल्या भांडणात खून केल्याची फिर्याद दिली. तपास अंती पोलिसांनी आरोपींना अटक केली.
सदर प्रकरणी आरोपी तर्फे सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला.सदर नाराजीने आरोपी सलमान जिलानी पठाण याने उच्च न्यायालयात ॲड.अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत जामीन करिता अर्ज दाखल केला. सदर आरोपी विरुद्ध ढोबळ आरोप केले असून,घटनेचा कोणत्याही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आरोपीने मारहाण केल्याचे जबाब देत नाही. या आशयाचे युक्तिवाद उच्च न्यायालयाने मान्य करत, आरोपीला जामीन मंजूर केला. सदर प्रकरणी आरोपी तर्फे ॲड.अजिंक्य रेड्डी यांनी काम पाहिले त्यांना ॲड. विष्णु कंदे,ॲड. युसूफ शेख यांनी सहकार्य केले.
