चांगले विचार देण्याचे सामर्थ्य भाषेमध्ये आहे-प्रा. प्रवीण जाहुरे
उदगीर (एल.पी.उगीले) मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सोबत असते ती भाषा. भाषा हीच माणसांना घडवण्याचे काम करते. चांगले विचार देण्याचे सामर्थ्य भाषेमध्ये आहे. असे उद्गार महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथील प्रा. प्रवीण जाहुरे यांनी काढले. ते छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयामध्ये मराठी विभागात आयोजित केलेल्या मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन व भित्तिपत्रक प्रकाशन समयी बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य तथा मराठी विभाग प्रमुख डॉ.रामकिशन मांजरे हे होते. तर प्रमुख उपस्थिती अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एल.एच. पाटील, डॉ. सुरेश शिंदे यांची होती.
पुढे बोलताना मराठी भाषेचे महात्म्य सांगताना जाहुरे म्हणाले, सुरेश भट्ट म्हणाले होते, ‘धर्म पंथ जात एक जाणतो मराठी,एवढ्या जगात माय मानतो मराठी ‘ ‘तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले, ‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन। ‘ अशी मराठी भाषेची थोरवी आहे. साहित्य हे मनोरंजन करते, त्या सोबतच प्रबोधन करत असते, असेही यावेळी ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे ‘लोकसंवाद’ लोकसाहित्य विशेषांक या भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
अध्यक्षीय समारोपप्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.मांजरे म्हणाले, आपल्या लेखणीतून अतिशय दर्जेदार भित्तिपत्रक आपण तयार केलात.यातून तुमच्या कलागुणांना वाव मिळत असतो.मराठीचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी आहे. आपण अविरतपणे काम करावे. याप्रसंगी डॉ.एल.एच.पाटील यांनी मराठी भाषेचे गोडवे गात असताना म्हटले,भाषेचे ज्ञान असणाऱ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. भाषेचे ज्ञान असणारे सर्वगुणसंपन्न बनतात. त्यामुळे आपल्याला मराठी भाषेचे चांगले ज्ञान अवगत असणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुरेश शिंदे यांनी केले. त्यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, मराठी भाषेचे संवर्धन करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मराठी भाषेला खूप मोठा इतिहास आहे. असे उद्गार काढले.सूत्रसंचालन कोमल देशपांडे यांनी तर आभार श्वेता शेल्हाळे यांनी मानले. या कार्यक्रमाला डॉ.नरसिंग कदम, प्रा.गोविंद खराबे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
