कनिष्ठ लिपिक पदाच्या प्रस्तावासाठी मुख्याध्यापिकेच्या गळ्याला लावला चाकू, निलंगा येथील शिवाजी विद्यालयातील प्रकार, कार्यालयाची तोडफोड
निलंगा (प्रतिनिधी) : निलंगा येथील नामवंत असलेल्या शिवाजी शिक्षण प्रसारक संस्था अंतर्गत चालवण्यात येत असलेल्या शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेला कनिष्ठ लिपिक पदासाठी माझ्या नावाचा प्रस्ताव का पाठवला नाही? म्हणून मारहाण करून चाकूचा धाक दाखवत जिवे मारण्याचा प्रयत्न करत कार्यालयातील साहित्याची तोडफोड करून महत्त्वाची कागदपत्र फाडून टाकण्याचा प्रयत्न झाला.
विद्यालयाच्या समोरच पोलीस ठाणे असल्यामुळे मुख्याध्यापिकेने धावत पळत पोलीस स्टेशन गाठले, आणि आपला जीव वाचवला.
याबाबतची माहिती अशी की, येथील शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यकारी मंडळात वाद आहे. हा वाद न्यायप्रविष्ठ असून येथील मुख्याध्यापिका दीपश्री तुकाराम जाधव या २४ वर्षापासून शिक्षण संस्थेमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी त्यांच्याकडे मुख्याध्यापिका पदाचा पदभार देण्यात आला आहे. संस्थेतील कनिष्ठ लिपिक पदाबाबत आठ महिन्यापूर्वी गुणानुक्रमे स्वप्निल शेळके यांची निवड झाली होती, याबाबत राधिका श्रीराम साळुंके यांनी आक्षेप नोंदवला होता. याबाबत 20 मार्च रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयात सुनावणी झाली, त्यानंतर शनिवारी ता २२ रोजी मुख्याध्यापिका दीपश्री तुकाराम जाधव ह्या दररोज प्रमाणे शाळेमध्ये आपल्या कार्यालयातील कामकाज करत असताना राधिका श्रीराम सोळुंके व सुवर्णा श्रीराम सोळुंके या कार्यालयात येऊन लिपिक पदाच्या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या करून माझा प्रस्ताव का पाठवला नाही? दुसऱ्या व्यक्तीचा प्रस्ताव कोणत्या आधारावर पाठवला? त्यांच्या नावाचे मस्टर का भरत आहात? म्हणून मुख्याध्यापिकेला मारहाण करीत कार्यालयातील संगणक तोडफोड करून, हजेरीपत्र, हालचाल रजिस्टर, यासह विविध कागदपत्राची फडाफाडी केली. असा आरोप मुख्याध्यापिकेने केला आहे.
त्याचबरोबर मुख्याध्यापिकेला मारहाण करत असताना कार्यालयातील काही कर्मचारी त्या ठिकाणी धावून आले. एक जण चक्कर येऊन पडला. या दोघांमध्ये वाद सुरू असताना एकीने मुख्याध्यापिकेला चाकूचा धाक दाखवत प्रस्तावावर सह्या कर, म्हणून धमकी देण्याचा प्रयत्न केला. कार्यालया बाहेर कांही अनोळखी तीन-चार पुरुष मंडळी उपस्थित होते. अशा परिस्थितीत त्यांच्या तावडीतून मुख्याध्यापिका श्रीमती जाधव यांनी सुटका करून समोरच पोलीस ठाणे असल्यामुळे धावत – धावत पोलीस ठाणे गाठले व आपला जिव वाचवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शाळेतील कार्यालयातच झाला. याबाबत दीपश्री जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलंगा पोलीस ठाण्यात राधिका श्रीराम सोळुंके व सूवर्णा श्रीराम सोळुंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुख्याध्यापिका सध्या घाबरलेल्या अवस्थेत असून याबाबत आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. अशी त्यांची मागणी आहे.
शैक्षणिक क्षेत्रात अशी घटना घडल्यामुळे सर्वत्र या घटनेचा निषेध केला जात असून गुन्हा दाखल करू नका म्हणून एका काँग्रेसच्या राजकीय नेत्याने थेट पोलीस ठाण्यात फोन करून दबाव आणला असल्याचे संबंधित मुख्याध्यापिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे हा काँग्रेसचा नेता कोण? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. महिला मुख्याध्यापिकेच्या मारहाणी बाबतच्या या घटनेचा निषेध मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने सुद्धा करण्यात आला आहे.
