रेशन कार्ड धारकांनी केवायसी करावी – तहसीलदार बोरगावकर
उदगीर (एल पी उगिले)
उदगीर तालुक्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेचे एकूण 44 हजार 9 12 रेशन कार्ड आहेत. उदगीर तालुक्यामध्ये दोन लाख तीस हजार 196 इतकी लाभार्थी संख्या असून त्यापैकी एक लाख 50 हजार 683 लाभार्थ्यांनी केवायसी केलेली आहे. मात्र अजूनही जवळपास 80 हजार लाभार्थ्यांनी केवायसी केली नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नसल्याची खंत तहसीलदार राम बोरगावकर यांनी व्यक्त करून रेशन कार्ड धारकांनी तात्काळ ही केवायसी करावी, असे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना सुरू आहेत. तालुक्यातील पात्र शिधापत्रिका धारकांना शासकीय अनुदानित अन्नधान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांमध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे दिनांक 31 मार्चपर्यंत इ केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या सदस्यांचे ई-केवायसी मुदतीत पूर्ण होणार नाही, त्यांचा अन्नधान्याचा लाभ बंद होणार आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांनी मुदतीमध्ये आपली ई केवायसी करून घ्यावे. असेही आवाहन तहसीलदार राम बोरगावकर यांनी केले आहे.
पात्र लाभार्थ्यांनी आपल्या गावातील रास्त भाव दुकानदाराची संपर्क करून तात्काळ आपली ई केवासी पूर्ण करून घ्यावी. ई केवायसी करण्यासाठी संबंधित लाभार्थी यांनी रास्त भाव दुकानात समक्ष उपस्थित राहून ई पॉस मशीन वर बायोमेट्रिक अथेंटीकेशन किंवा मेरा ई केवायसी ॲप वर जाऊन 31 मार्च पर्यंत केवायसी करावी. अन्यथा अन्नधान्याचा लाभ बंद होईल, आणि त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित शिधापत्रिका धारकांची राहील. असा इशाराही तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिला आहे.
