शास्त्री विद्यालयात दहावीत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) पुढील शैक्षणिक वर्षातील दहावीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात संपन्न झाला. पालक मेळाव्याचे अध्यक्ष व्यंकटराव गुरमे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासूणे, मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, उपमुख्याध्यापक अरूण पत्की, पालक प्रतिनिधी सयाजी दराडे,अजय कुलकर्णी, दहावी प्रमुख संतोष गजलवार,प्रशांत राजूरकर,अंजलीताई नळगीरकर यांची उपस्थिती होती.
मूल्यमापन प्रमुख बालाजी पडलवार यांनी एकूण परीक्षा व अतिरिक्त गुण कशा प्रकारे मिळतात, यावर चर्चा केली.तर शिक्षक मनोगतामध्ये प्रीती शेंडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. आहार समतोल व सकस असावा तसेच क्रीडा,कला, संगीत यातून मिळणाऱ्या वाढीव गुणांबाबत चर्चा केली. पालक प्रतिनिधी सयाजी दराडे यांनी मुलांकडे पालकांनी लक्ष द्यावे व पाल्याच्या आहार,आरोग्य, मित्रसंगत याकडे लक्ष द्यावे.पालक प्रतिनिधी अजय कुलकर्णी यांनी लाल बहादुर शास्त्री विद्यालयात गुणवत्तेबरोबर संस्कार दिले जातात.शाळा हे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे महत्वाचे साधन असते. ताणतणाव कमी करण्यासाठी प्राणायाम व योगा अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचे आयोजन विद्यालयात करावे अशी सूचना केली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे यांनी विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा,अभ्यासाचे नियोजन कसे करावे? यासंदर्भात माहिती दिली. शिक्षणाबरोबरंच राष्ट्रप्रेम,संस्कार देणारी शाळा विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य करते.
अध्यक्षीय समारोपात व्यंकटराव गुरमे यांनी मुलांमध्ये शिस्त असली पाहिजे, व पालकांनी मुलांचे अतिरिक्त लाड करू नये,पालकांनी आपल्या पाल्याच्या बाबतीत जागरुक असले पाहिजे. असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दहावी प्रमुख संतोष गजलवार यांनी केले. स्वागत, परिचय व सूत्रसंचालन लक्ष्मी चव्हाण व आभार राहुल नेटके यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक कृष्णा मारावार,पर्यवेक्षक माधव मठवाले, पर्यवेक्षक किरण नेमट,दहावी प्रमुख संतोष गजलवार, सहप्रमुख दिलीप पाटील तसेच व्यवस्थेतील सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले.