त्रयस्थ व्यक्तीच्या तक्रारीची दखल न घेता सेवकाचा पगार द्या : उच्च न्यायालय
छत्रपती संभाजीनगर :(एल.पी.उगीले)
एका त्रयस्थ व्यक्तीच्या तक्रारी वरून लातूर जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी मापारी यांनी व्यंकटेश माध्यमिक विद्यालय मध्ये कार्यरत सेवक प्रभाकर कोळी याची जात वैधता प्रलंबित आहे. या कारणास्तव वारंवार सदर शाळेस अहवाल मागून मुख्याध्यापक यांचे वेतन शिक्षणाधिकारी यांच्या खात्यावर संलग्न करण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशानंतर कोळी यांचे वेतन रोखले. सदर नाराजीने सेवक प्रभाकर कोळी यांनी ॲड.अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल केली.याचिकेच्या प्राथमिक सुनावणी च्या वेळी सदर कार्यवाही एका त्रयस्थ व्यक्तीच्या तक्रारी वरून करण्यात आलेली असून, त्रयस्थ व्यक्तीच्या तक्रारीवर कार्यवाही न करण्याचे आदेश विविध न्यायनिवाड्याद्वारे उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. असा युक्तिवाद ॲड.अजिंक्य रेड्डी यांनी मांडला. न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी शिक्षण अधिकाऱ्यास जात वैधता प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. त्रयस्थ व्यक्तीच्या तक्रारीची दखल घेऊ नये. असे उच्च न्यायालयाचे विविध आदेश असताना देखील सदर शिक्षण अधिकाऱ्यांचे सदरचे कृत्य हे विना अधिकार आहे. असे निरीक्षण आणि ताशेरे नोंदवत, सेवकाचा पगार नियमित देण्याचे आदेश जारी केले.
याचिकेची पुढील सुनावणी 20 जुलै 2025 रोजी होणार आहे. सदर प्रकरणी ॲड.अजिंक्य रेड्डी यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. विष्णू कंदे यांनी सहकार्य केले.
